मुंबई \ ऑनलाईन टीम
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काही दिवसापूर्वी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठवले आपल्या काव्यमय फटकेबाजी ओळखले जातात. या भेटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत शरद पवारांना एक सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा काव्यमय सल्ला चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी, कारण २०२४ मध्ये पंतप्रधान बनणार आहेत नरेंद्र मोदी. ते तर आहेत आंबेडकरवादी, मग का बनणार नाहीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असं रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत ट्वीट केले आहे. सोबत एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एकतर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली, ही चांगली गोष्ट आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेत. परंतु सध्या भाजपाच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र येणं अशक्य आहे आणि जरी एकत्र आले तरी देखील २०२४ च्या निवडणुकीत या देशाची जनता नरेंद्र मोदी यांनांच मतदान करणार आहे. त्यानांच पुन्हा एकदा सत्तेवर आणण्याचा प्रयत्न या देशातील जनता करणार आहे.” असं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत. तसेच एकतर २०१९ च्या निवडणुकीत प्रशांत किशोर आमच्यासोबत नव्हते, भाजपसोबत नव्हते. तरी देखील भाजपने जवळजवळ ३०३ जागा स्वतःच्या बळावर निवडून आणल्या आणि या देशात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आता प्रशांत किशोर यांनी तर ममता बॅनर्जींच्या विजयानंतर पश्चिम बंगालनंतर, मी आता अशाप्रकारच्या राजकारणात राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका मांडली होती आणि शरद पवारांसोबतची माझी भेट व्यक्तिगत होती, असंही त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे ठीक आहे.
विरोधी पक्षांची त्यांना जर आघाडी करायची असेल तर त्यांना तो अधिकार आहे. परंतु किती जरी आघाडी केली, तरी देखील या देशातील जी परिस्थिती आहे. नरेंद्र मोदींनी मागील सात वर्षांमध्ये जी काही कामं केली आहेत व पुढील तीन वर्ष देखील ते अत्यंत चांगली कामं करणार आहेत. त्यामुळे या देशात काँग्रेसलाच ४०-४२ च्या पुढे जाता येत नाही, तर दुसऱ्या पक्षांना ते कसं शक्य होईल?, असा सवाल देखील रामदास आठवले यांनी यावेळी विचारला आहे