वार्ताहर \निपाणी
ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागाने भयावह महापूर अनुभवला. अशा या महापुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. पुराच्या पाण्यामुळे घरकुलेही जमीनदोस्त झाली. या पूरग्रस्तांना शासनाने विविध पातळीवर मदतीचा हात पुढे केला. तात्कालीक मदत, जीवनावश्यक वस्तू यासह घरकुल उभारणीसाठी निधीही दिला. जत्राट येथेही घरकुल निधी देण्यात आला. पण 30 पूरग्रस्तांना घरकुलांचे नुकसान होऊनही निधी देण्यात आलेला नाही. यामुळे हे पूरग्रस्त आजही उघडय़ावरच असून संताप व्यक्त होत आहे. असाच प्रकार निपाणी, चिकोडी तालुक्यासह जिल्हय़ात पूरग्रस्तांना अनुभवास मिळाला आहे. याची दखल लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने घेत पूरग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
जत्राट येथे 193 कुटुंबांना महापुराचा फटका बसल्याची शासन दरबारी नोंद आहे. या सर्व 193 कुटुंबांना प्राथमिक स्वरुपात प्रत्येकी 10 हजारप्रमाणे आपत्कालीन निधीही देण्यात आला. यानंतर सर्व घरांचा सर्व्हे करताना नुकसानीची माहिती संकलीत करण्यात आली. ग्रामपंचायत, महसूल विभागाकडून हा सर्व्हे होताना घरांच्या नुकसानीची मदत देण्याची घोषणा जाहीर करण्यात आली.
या सर्व्हेनुसार 193 पैकी 163 पूरग्रस्तांना घरकुल दुरुस्ती व उभारणीचा निधीही मंजूर केला. पण अजून 30 पूरग्रस्त घरकुल नुकसानग्रस्तांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही. यामुळे हे पूरग्रस्त निधीअभावी उघडय़ावर पडले आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले तरीदेखील अधिकाऱयांनी कोणतीच दखल घेतली नसल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून होत आहे.
महसूल मंत्र्यांची पाहणी फक्त फार्स
महसूलमंत्री आर. अशोक यांनी पूरस्थिती व नुकसान याची पाहणी करणारा दौरा केला. या दौऱयामध्ये नुकसानग्रस्त घरकुलाची पाहणी देखील केली. यावेळी घरकुल नुकसानीचा निधी त्वरित द्या. यासाठी फक्त बीपीएलकार्डच पहा, अशी सूचना अधिकाऱयांना केली. पण या दौऱयात महसूल मंत्र्यांनी ज्या घराची पाहणी केली, त्या घरांना नुकसान भरपाई मिळालेलीच नाही. यामुळे हा दौरा फक्त फार्सच ठरल्याचा संताप व्यक्त होत आहे.
निधी न मिळालेले पूरग्रस्त
उमेश पाटील, सोमनाथ पाटील, भास्कर पाटील, रायगोंडा पाटील, मधुकर पाटील, उमेश शिरोळे, हसन फकीर, बुडन फकिर, अजमतबी फकीर, अबुबक्कर फकिर, आप्पासो फकिर, इसूब फकिर, अक्तर फकिर, आप्पासो रेंदाळे, आण्णासो रेंदाळे, लक्ष्मण रेंदाळे, इक्बाल फकिर, रमेश पाटील, संतोष पाटील, सुधाकर पाटील, आण्णासो पाटील, आकाश रेंदाळे, सुधाकर रामा पाटील, मधुकर रामा पाटील, राजेंद्र पाटील, सदाशिव रेंदाळे, राजेंद्र पाटील, मारुती जबडे, चंद्रकांत जबडे, आण्णासो पाटील, बयाबाई जबडे, यशवंत जबडे, महेश पाटील, रामगौडा पाटील.
भाडे देणार ही घोषणा हवेतच
अतिवृष्टी व महापुरामुळे घरांची पडझड झाली. अशा कुटुंबांना इतरत्र स्थलांतर व्हावे लागले. अशा कुटुंबांना भाडे देण्याची घोषणा शासनाने केली. पण स्थलांतर केलेल्या कुटुंबांना एक रुपयाही भाडे म्हणून आजतागायत मिळालेला नाही. यामुळे भाडे देणार ही घोषणा हवेत विरल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.