‘सिंधुदुर्ग’ माझ्या घरच्या जिल्हय़ासारखा – के. मंजुलक्ष्मी : कोरोना आपत्तीत सर्वांना सोबत घेऊन काम करू शकल्याचे समाधान!
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
पर राज्यातील असूनही सिंधुदुर्ग हा स्वत:चा जिल्हा आहे, या भावनेतून या जिल्हय़ाच्या भल्यासाठी कार्यरत असणाऱया तसेच कोरोना, तौक्ते वादळ आणि पूरग्रस्त परिस्थितीत सर्वसामान्यांच्या जीविताची एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेणाऱया जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना ‘तरुण भारत’तर्फे ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले. तरुण भारतच्यावतीने आवृत्ती प्रमुख शेखर सामंत यांनी गुरुवारी हा सन्मान सुपुर्द केला.
कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी समयसूचकता दाखवत ज्या तडफेने कामगिरी बजावली, त्यामुळे जिल्हय़ातील अनेकांचे प्राण वाचू शकले. कोरोना आपत्तीचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गला बसला असला, तरी के. मंजुलक्ष्मी यांनी जातिनिशी मैदानात उतरत प्रशासकीय यंत्रणा ज्या तडफेने कामाला लावली आणि ज्या समयसूचकतेने अत्यावश्यक वैद्यकीय यंत्रणा उभी केली, त्यामुळेच अनेकांचे प्राण वाचले. अतिशय कार्यक्षमपणे लसीकरण मोहीम राबवत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात त्यांनी यश मिळविले. तौक्ते वादळापूर्वीही किनारपट्टी भागात त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्यानेच वित्तहानी मोठय़ा प्रमाणावर झाली, तरी जीवितहानीपासून हा जिल्हा वाचला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत कोकणातील जनतेचे प्रमुख मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘तरुण भारत’तर्फे सिंधुदुर्गातील जनतेच्यावतीने ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन त्यांना गौरविण्यात आले. के. मंजुलक्ष्मी यांच्या या कामगिरीवर तरुण भारततर्फे खास प्रसिद्ध करण्यात आलेला विशेष लेख आकर्षक पेमच्या माध्यमातून त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी तरुण भारतचे सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी संदीप गावडे, ओरोस प्रतिनिधी दत्तप्रसाद वालावलकर, कसाल प्रतिनिधी विनोद परब, छायचित्रकार सतीश हरमलकर व ओरोस कार्यालयचे ऑपरेटर दिनेश गोसावी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग हा घरच्या जिल्हय़ासारखाच – के. मंजुलक्ष्मी
तरुण भारततर्फे करण्यात आलेल्या या विशेष सन्मानानंतर बोलताना के. मंजुलक्ष्मी यांनी तरुण भारत परिवाराचे विशेष आभार मानले. ‘या जिल्हय़ावर माझे प्रेम असून या ठिकाणी मनापासून येथील जनतेची सेवा करण्याचा मी प्रयत्न करते. आपलं जन्म ठिकाण असलेल्या केरळची संस्कृती आणि सिंधुदुर्गची संस्कृती जवळपास मिळतीजुळती असल्यामुळे मला घरच्या वातावरणातच काम केल्याचा आनंद मिळतो, असे त्या म्हणाल्या. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच कोरोनाच्या दीर्घ मुदतीच्या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देण्याची वेळ आपल्यावर आली. आपला बहुतांश कार्यकाळ हा या आपत्तीशी झुंज देण्यातच खर्च झाला. त्यामुळे सकारात्मक काम करण्याची संधी मला मिळाली नाही. मात्र कोरोनाचे संकट आता कमी झाले असून मिळणाऱया पुढील काळात या जिल्हय़ामध्ये भरीव असे विकासात्मक काम करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत येथील प्रशासकीय यंत्रणा व जनतेला सोबत घेऊन दिलासात्मक काम करता आले, याचे आपल्याला समाधान वाटते. या आपत्तीच्या काळात जिल्हय़ातील जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल या जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. ‘तरुण भारत’सारख्या प्रमुख वृत्तपत्राने या काळात आम्हाला जी साथ दिली, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाची प्रमुख या नात्याने तरुण भारतचे व या वृत्तपत्रात काम करणाऱया सर्व सहकाऱयांचे मनापासून आभार मानते, असं त्या म्हणाल्या.