महामारीची दुसरी लाट हाताळण्यात सरकारला अपयश : माजी आमदार सतीश सैल यांचा आरोप
प्रतिनिधी / कारवार
राज्यातील कोरोना महामारीची दुसरी लाट हाताळण्यात सरकारला अपेक्षित यश आले नाही, असा आरोप कारवारचे माजी आमदार सतीश सैल यांनी केला.
ते पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेने राज्यासह संपूर्ण देशात कहर केला आहे. याला कारवार जिल्हा अपवाद नाही. तथापि जनतेने आणि राज्य सरकारने पहिली लाट जेवढय़ा गांभीर्याने घेतली, तेवढय़ा गांभीर्याने दुसरी लाट न घेतल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे काय परिणाम होतात याची जाणीव जनतेला पहिल्या लाटेच्यावेळीच झाली आहे. परिणामी पहिल्या लाटेच्यावेळी केवळ जनताच नव्हे तर सरकार कमालीचे जागृत झाले होते. तथापि आता मात्र सर्व स्तरावर आनंदी आनंद सुरू आहे. कोरोना नियमावलीचे योग्य त्या प्रमाणात पालन होईनासे झाले आहे. याचा फार मोठा फटका जनतेलाच बसणार आहे. आज आम्ही कारवारचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांची भेट घेऊन लसीच्या उपलब्धतेबद्दल चौकशी केली असता, लसीचे 20 हजार डोस शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. याचाच अर्थ असा की, विशेष करून ग्रामीण प्रदेशातील जनता, अद्यापही लस घेण्यासाठी पुढे सरसावलेली दिसत नाही. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने जनतेला लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे, कोरोना महामारीची दुसरी लाट जिल्हय़ातील ग्रामीण प्रदेशात थैमान घालणार नाही, याची दखल घ्यावी. जिल्हा प्रशासनाने ग्राम पंचायत स्तरावर लस घेतलेल्यांची यादी तयार करावी, अशी सूचना करून सैल पुढे म्हणाले, 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे 18 वर्षांवरील युवक आणि युवती सरकारी रुग्णालयात दाखल होऊन लसींबद्दल चौकशी करीत आहेत. तथापि तेथे त्यांना निराशा पदरी पडत आहे. आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडे चौकशी केली असता, याबद्दल सरकारकडून अद्याप नियमावली निश्चित करण्यात आलेली नाही, असे सांगण्यात येत आहे. त्याकरिता सरकारकडून किंवा जिल्हा प्रशासनाने याबद्दल योग्य ती माहिती द्यावी. जेणेकरून लसीवरून निर्माण झालेला गोंधळ दूर करता येईल. दुसऱया लाटेशी दोन हात करण्यासाठी आपण नेहमी तयार असल्याचे माजी आमदार सैल यांनी पुढे सांगितले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे वकील देवदत्त कामत, प्रभाकर मलसकर आदी उपस्थित होते.