पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतूक : भरपाईचा निर्णय मुख्यमंत्री नक्की घेतील! : मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत आज ओरोसला बैठक
प्रतिनिधी / कणकवली:
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे काम केल्यास किती चांगले काम होऊ शकते, याचे चांगले उदाहरण सिंधुदुर्ग जिल्हय़ाने देशाला दाखवून दिले आहे. यात प्रशासनाला सहकार्य केलेल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. आजघडीला आपला जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. अजून 3 मेपर्यंत अशाच प्रकारचे सहकार्य करा, अशी आपली विनंती आहे. तसेच काजू, आंबा, मच्छीमार यांचे कोरोनामुळे जे नुकसान झाले आहे, त्याबाबत भरपाईचा निर्णय मुख्यमंत्री कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर घेतील, याचा आपल्याला विश्वास असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येथील प्रशासकीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सिंधुदुर्गमधील 99 टक्के जनतेने अतिशय चांगल्याप्रकारे सहकार्य केले. मात्र, 1 टक्क्यामुळे काही समस्या येत असतील, तर त्यांची मस्ती मोडीत काढण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनामुक्त झालेला जिल्हा टिकवायचा आहे!
आपल्याला कोरोनामुक्त झालेला जिल्हा टिकवायचा आहे. त्यासाठी सहकार्याची आपणाला विनंती आहे. शिवभोजन थाळीत वाढीसाठीच्या मागणीनुसार कणकवलीसह मालवण, देवगड, वैभववाडीतही वाढीव थाळीला मान्यता देण्यात आली आहे. कोणीही उपाशी राहू नये, यासाठीचा आमचा प्रयत्न असून तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आंबा, काजू, मच्छीमारीसोबतच गणेश चतुर्थीसाठी बनवायच्या गणपतीची माती आणण्याच्यादृष्टीनेही काही नियोजन लवकरच करण्यात येणार आहे.
आठ कोटीचा निधी कणकवली न.पं.ला
कणकवलीसह जिल्हय़ातील नगर पंचायत, परिषदांना कोरोनासाठी प्रत्येकी 3-3 लाखांचा निधी आपण दिला. मात्र, वैभववाडी व देवगडचा प्रस्ताव नसल्याने त्यांना देता आले नाहीत. त्यांचा प्रस्ताव आल्यास अजूनही पैसे देण्यात येतील. विकासकामांबाबत आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. कणकवली नगर पंचायतीला नगरोत्थानमधून 3 कोटी 62 लाख, नागरी योजनेतून 1 कोटी 70 लाख, फायर ब्रिगेडसाठी 3 कोटी 50 लाखांचा निधी आपण दिला. जवळपास आठ कोटींचा निधी आपण नगरपंचायतीला दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
विकासकामांत राजकारण नाही! कणकवलीसंदर्भात ज्यावेळी विषय आला, त्यावेळी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांच्यासोबत चर्चा झाली. कणकवलीकर आपणाला महत्वाचे असल्याचे या सर्वांनी सांगून निधीची मागणी केली. त्यानुसार आम्ही पैसे दिल्याचे सांगत विकासकामांत राजकारण करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हय़ातील नगरपंचायती, परिषदांना नगरोत्थानमधून सुमारे 25 ते 30 कोटींचा निधी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत उद्या (गुरुवारी) जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.