लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित : बेरोजगारी, कोरोना संसर्गाचे मुद्देही ठरले वादाचे : संसद अधिवेशनाला प्रारंभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून कोरोना नियमावलीच्या चौकटीत प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. दुसरीकडे कोरोना संसर्ग, बेरोजगारी आणि चीनच्या घुसखोरीच्या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीच्या सर्व उपाययोजना करत अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. खासदारांच्या हजेरीची पद्धत बदलण्यात आली असून, आता ‘अटेंडेंस रजिस्?टर’ ऍपद्वारे आपली उपस्थिती नोंदवत आहेत. लोकसभेत खासदारांच्या डेस्कसमोर काचेचे शिल्ड देखील लावण्यात आलेले आहे. पहिल्या दिवशीचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे आश्वासन लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी दिले. कोरोनाकाळात आपण हे पावसाळी अधिवेशन घेत आहोत. अशावेळी देशातील परिस्थिती समजून घेत योग्य ते सहकार्य करावे, असेही आवाहन ओम बिर्ला यांनी उपस्थित सदस्यांना केले.
प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, असा प्रस्ताव सोमवारी सकाळीच संमत झाला. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश पक्षांनी प्रश्नोत्तरांच्या तासाशिवाय कामकाज करण्यास सहमती दिली, असे सरकारकडून सांगण्यात आले. प्रश्नोत्तराचा तास नसला तरी चालेल, यावर बहुतांश पक्षाचे नेते तयार झाले. मात्र, काँग्रेसने त्याला विरोध दर्शवला. “प्रश्नोत्तराचा तास हा खूप महत्त्वाचा आहे. पण तुम्ही परिस्थितीमुळे हा तास होणार नाही असे सांगत आहात. प्रश्नोत्तराचा तास बाजूला काढून तुम्ही सभागृहाचे कामकाज करत आहात. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करताय’’ असे काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी म्हणाले. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याच्या निर्णयाचे भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी सुद्धा समर्थन केले. सरकारला प्रश्न विचारण्याचे इतरही पर्याय आहेत. सरकार चर्चेतून पळ काढत नाही, असेही लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शून्य प्रहरात सरकारला प्रश्न विचारले जाऊ शकतात असा सल्ला दिला आहे.
30 खासदार कोरोना पॉझिटिव्ह
तपासणीमध्ये 30 खासदारांसह सचिवालयातील 50 कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार भाजपचे असून वायआरएस काँग्रेसचे 2, तर शिवसेना, द्रमुक आणि आरएलपीच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. यामध्ये मिनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे, परवेश साहिब सिंह वर्मा, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी., रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांच्यासह अन्य काही खासदारांचा समावेश आहे. सर्व खासदारांची 13 आणि 14 सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्यातील 30 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व खासदारांची कोविड 19 चाचणी करण्यात आली.
दिल्लीत पॉझिटिव्ह, जयपूरमध्ये निगेटिव्ह
संसद अधिवेशनादरम्यानच्या तपासणीत राजस्थानमधील नागौर मतदारसंघातील खासदार हनुमान बेनिवाल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, त्यानंतर जयपूरमध्ये केलेल्या तपासणीमध्ये निगेटिव्ह अहवाल आल्याने त्यांनी दोन्ही अहवाल सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच दोन अहवालांपैकी कोणता अहवाल ग्राहय़ धरावा असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी कोरोना चाचण्यांच्या अहवालांबाबत शंका-कुशंका उपस्थित केल्या.
देशात कोरोना नियंत्रणात : आरोग्यमंत्री
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत लोकसभेत माहिती दिली. भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी झाले आहे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने जे प्रयत्न केले आणि तातडीने जी पावले उचलली त्याचा हा परिणाम आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोनाचे जास्त रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नवी दिल्लीमध्ये झाले. तरीही जगाचा विचार केल्यास भारतात संसर्गाचा वेग मंदावला आहे, असे वक्तव्य लोकसभेत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी केले. केंद्र सरकारने वेळेत केलेला लॉकडाऊन आणि प्रभावी उपाययोजना यामुळे आपण कोरोना संसर्ग रोखू शकलो असेही त्यांनी सभागृहाला सांगितले. देशात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढते आहे. कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी 3 ते 9 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत फास्ट ट्रक व्हॅक्सिन आणण्याचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळेंची प्रश्नांची सरबत्ती
राज्यसभेमध्ये कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना आणि बेरोजगारीच्या मुद्यावरून प्रश्नांची सरबत्ती करत केंद्रातील मोदी सरकारला घेरले. सुप्रिया सुळेंनी लोकसभेतील आजच्या कामकाजाबाबतचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून याबाबतची माहिती दिली. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला. यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु असे होताना दिसत नाही, अशी टीका सुळे यांनी सरकारवर केली केली.
संसदेतील सर्व खासदारांनी लष्कराला पाठबळ द्यावे : पंतप्रधान
संसदेतील सर्वपक्षीय खासदारांनी एकमताने सीमेवर लढणाऱया सैनिकांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, या अधिवेशनात संसदेवर एक विशेष जबाबदारी आहे. आज आपल्या देशाचे वीर जवान सीमारेषेवरील दुर्गम भागात शौर्याने लढत आहेत. काही दिवसांनी या भागात बर्फवृष्टी सुरू होईल. मात्र, तरीही आपले सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी दुर्गम भागात पाय रोवून उभे आहेत. त्यामुळे संसदेतील सर्व खासदारांनी एकमताने भारतीय जवानांच्या पाठिशी उभा असल्याचा संदेश दिला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याशिवाय, नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर लस येईपर्यंत कोणतीही ढिलाई बाळगून चालणार नाही, असेही सांगितले.