प्रतिनिधी/ बेळगाव
कृतीविना विचार निरर्थक ठरतो. ‘क्रियेविण वाचाळता’ उपयोगी ठरत नसते. त्यामुळे समाजात अशाच लोकांची संख्या वाढू लागली तर समाज सत्व हरवून बसतो. तसे होणे हितकारक नाही. म्हणूनच प्रश्न पडणे आणि त्यासाठी भूमिका घेणे आवश्यक आहे. याचे भान देणारे नाटक म्हणजे ‘एक झुंज वाऱयाशी’!
पु. ल. देशपांडे अनुवादित या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी संध्याकाळी जेएनएमसीच्या कन्व्हेन्शन सभागृहात झाला. बेळगावमधील 60 डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मेडिको कल्चरल आर्ट असोसिएशनतर्फे या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्तेपुढे शहाणपण नमते किंबहुना सत्ता माणसाला नीतीमूल्यांचा विसर पाडण्यास कारणीभूत ठरते का? असा प्रश्न केंद्रीभूत करून हे नाटक पुढे सरकते. समाजात सर्वच माणसे जुगारी नसतात. म्हणूनच ती प्रश्न विचारण्याचे धाडस करतात. सत्तेला नमवू शकतात, असा दिलासाही हे नाटक देते. या नाटकात अशुतोष घोरपडे, श्रीनिवास नार्वेकर, शोभना मयेकर आणि दीपक करंजीकर यांनी भूमिका बजावल्या. सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करणाऱया श्रीनिवास नार्वेकर आणि सत्तेचे प्रतीक असणारे दीपक करंजीकर यांच्यातील संवाद हे या नाटकाचे बलस्थान होय. त्यांना अन्य दोन कलाकारांची तितकीच समर्थ साथ मिळाली.
प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बसवराज बिज्जरगी यांनी सर्वांचे स्वागत केले. उपाध्यक्षा नीता देशपांडे यांनी या नाटकाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. सचिव राजेश लाटकर यांनी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले. सूत्रसंचालन डॉ. सोनल धामणकर यांनी केले. डॉ. अभिजित देशपांडे यांनी आभार मानले. नाटकाच्या प्रयोगानंतर उपरोक्त डॉक्टरांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना दीपक करंजीकर म्हणाले, हे नाटक आजही समकालीन ठरते. कुतूहल असणे व त्यासाठी भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. परंतु आपण तशी भूमिका घेत नाही. याचे कारण भीती किंवा भूक असू शकते. परंतु समाजात घडोघडी दिसणारा भुक्कडपणा नाहीसा करण्यासाठी गढूळ पाण्यावर तुरटी फिरवावी तसे समाजात आपण ठाम आणि स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे.
दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांनी बेळगावकर रसिकांनी या गंभीर विषयाचे गांभीर्य नेमके ओळखले आणि नेमक्मया ठिकाणी दाद दिली, याबद्दल रसिकांची प्रशंसा केली.