अक्षता नाईक/ बेळगाव
प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही हेच यश संपादित करण्यासाठी व आपले नशीब आजमवण्यासाठी आपल्या बेळगावातील एक तरुण मुंबईला गेला मुजम्मील देसाई असे त्यांचे नाव. आपल्या परिश्रमांच्या आधारावर आणि कौशल्याच्या जोरावर त्याने एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नाव कमावले आहे. बालाजी प्रॉडक्शन अर्थात अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकता कपूरच्या क अक्षराने सुरू होणाऱया मालिकांच्या दिग्दर्शनात त्याचा रोल महत्त्वाचा आहे.
मध्यम कुटुंबातील आपल्या सर्वसामान्यांसारखे जीवन जगणारा मुजम्मली गेल्या वीस वर्षांपासून एकता कपूर यांच्या बालाजी प्रोडक्शनसाठी दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. एकता कपूर यांच्या गाजलेल्या सर्व टी.व्ही. मालिकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांचा जन्म बेळगावमधील वडगाव भागात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सात भावंडांसह त्याची वाढ झाली. त्याचा जन्म होण्याच्या दोन महिन्यांआधीच दुर्दैवाने त्याच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्याने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण इस्लामिया हायस्कूलमध्ये घेतले. त्यानंतर जुलै 2001 मध्ये मुंबईला जाऊन आपल्या बहिणीकडे आसरा मिळविला. यावेळी त्यांनी उदरनिर्वाहासाठी कोठेतरी काम करण्याचा विचार केला. परंतु सोनीच्या ‘झुकी पलके शो’चे दिग्दर्शक श्याम माहेश्वरी यांचे सातवे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून बालाजी टेलिफिल्म्समध्ये जाण्याची संधी त्यांना मिळाली.
सहा महिन्यांतच ते मुख्य साहाय्यक दिग्दर्शक झाले. श्याम माहेश्वरी यांना मदत दिल्यानंतर दीपक चव्हाण यांच्याबरोबर गेले आणि त्यांना सहा वर्षांसाठी कहानी घर घर की, क्मयू की सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की, कैसा ये प्यार है, ’कही किसी रोज’ या बालाजी प्रॉडक्शनच्या सहकार्याने चालू असलेल्या टीव्ही मालिकांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करण्याची आव्हानात्मक जबाबदारी मिळाली.
बेळगावकरांसाठी अभिमानास्पद बाब
2003 मध्ये, कुसुम या शोसाठी युनिट दिग्दर्शक म्हणून काम करण्याची त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाल्यानंतर आजतागायत त्यांनी टेलिव्हीजनच्या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकताच त्यांना इंटरनॅशनल आयकॉनिक बेस्ट डायरेक्ट अवॉर्ड-2020 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ही बाब बेळगावकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
खूप मेहनती व आशावादी राहायला हवं
जेव्हा तुम्ही एका पातळीवर जाऊन पोहोचता तेंव्हा तुमची दखल कोणी ना कोणी नक्की घेतेच. तुम्ही चांगले काम नेहमी करत राहा. त्या कामाची दखल कुठे ना कुठे घेतली जाईलच. त्यासाठी खूप मेहनती व आशावादी राहायला हवं आपलं काम चोख करायचा नेहमी प्रयत करा. आनंद होतो जेव्हा तुम्हाला कोणत्यातरी कामासाठी योग्य ठरवलं जातं. आणि त्यात जर तुम्हाला पुरस्कार मिळाला तर चांगले काम करण्याची एक नवी आशा, उमेद जागी होते. तुम्ही एका विशिष्ट पातळीवर जाऊन पोहोचता तुमची दखल नक्की घेतली जाते. मात्र त्या कामाचा दर्जा कायम राखण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली पाहिजे, असे टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्दर्शक मुजम्मील देसाई सांगतात.
मुजम्मील देसाई यांनी आजपर्यंत केलेल्या टी.व्ही. मालिकांचे दिग्दर्शन
ख्वाईश, कहे ना कहे, कसम से (कस्तुरी), किस देश में है मेरा दिल, कहानी हमारे महाभारत की, कितनी मोहब्बत है, प्यार का बंधन, बेत्ताब दिल की तमन्ना है, पवित्र रिश्ता, तेरे लिए, बडे अच्छे लगते हैं, परिचय-नै जिंदगी के सपनो का, क्मया हुआ तेरा वादा, कुछ तो है तेरे मेरे दरमियान, अजीब दस्तान है ये, इतना करो ना मुझे प्यार, कसम तेरे प्यार की, परदेस में है मेरा दिल, कलश-एक विश्वास, दिल ही तोह है, आणि कसौटी जिंदगी की यासह अनेक मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच सध्या ते वेब सिरीजही करत आहेत. शिवाय त्यांचे 13 ते 14 स्वतःचे टीव्ही सेटअप आहेत.