कानाला सुखावणारा आवाज वयाच्या 74 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
प्रतिनिधी/ मुंबई
मनाला आनंद देणारा आणि कानाला सुखावणारा आवाज असलेले प्रतिभावंत गायक एस. पी बालसुब्रमण्यम यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती. पण नंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अखेरीस उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
ऑगस्ट महिन्यात एस. पी बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली होती. 5 ऑगस्ट रोजी त्यांना चेन्नईतील एमजीएम हेल्थकेअर या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांच्या यशस्वी उपचारांनंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. याविषयीची माहिती त्यांचे पुत्र एसपी चरण यांनी दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अशी माहिती रूग्णालयाने मेडिकल बुलेटीनद्वारे दिली. 5 ऑगस्ट रोजी एस.फ बालसुब्रमण्यम यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, गेल्या दोन तीन दिवसांपासून माझी तब्येत ठिक नाही. मला सर्दी ताप होता. त्यामुळे कोरोनाची चाचणी केल्यावर ती पॉझिटीव्ह आली आहे. डॉक्टरांनी मला होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम म्हणजेच एस. पी बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी झाला होता. तेलुगु, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. विविध 16 भारतीय भाषांमध्ये 40 हजारांहून अधिक गाणी गाण्याचा जागतिक विक्रम या आवाजाच्या किमयागाराच्या नावावर आहे. सर्वोत्कृष्ट गायक म्हणून त्यांना सहा वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 15 डिसेंबर 1966 रोजी श्री श्री श्री मर्यादा रामण्णा या तेलुगु चित्रपटापासून त्यांनी आपल्या गायन कारकिर्दिला सुरुवात केली होती. त्यांचे गुरु एस. पी कोदांडापणी यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते.
एस. पी बालसुब्रमण्यम यांनी 1981 साली हिंदी सिनेसृष्टीत गायक म्हणून पाऊल ठेवले. एक दुजे के लिये चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आणि यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण एस. पी बालसुब्रमण्यम यांना हिंदीत खरी ओळख मिळाली ती सलमान खानचा आवाज म्हणून. 1989 साली प्रदर्शित झालेल्या आणि अतिशय गाजलेल्या मैने प्यार किया या चित्रपटासाठी त्यांनी गाणी गायली. आते जाते हसते गाते, आजा शाम होने आयी, कबूतर जा जा जा, मेरे रंग में रंगनेवाली, मैने प्यार किया, आया मौसम दोस्ती का, दिल दिवाना ही या चित्रपटातील सगळी गाणी हीट झाली आणि एस. पी बालसुब्रमण्यम हे तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले. त्यानंतर जवळपास एक दशक ते सलमान खानच्या विविध चित्रपटांसाठी आवाज बनले. हम आपके है कौनमधील दिदी तेरा देवर दिवाना, मौसम का जादू, जुते दो पैसे लो, पहला पहला प्यार, धिकताना, मुझसे जुदा होकर, हम आपके है कौन, वाह वाह रामजी अशी सगळी गाणी अजरामर करण्यात बालसुब्रमण्यम यांचा मोठा वाट होता. लव या चित्रपटातील साथिया तुने क्या किया हे गाणेही त्यांच्याच आवाजामुळे हीट ठरले.