ऑनलाईन टीम / पुणे :
ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या सुमित्रा भावे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लेखक, निर्मात्या, दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. देवराई, दोघी, दहावी फ, अस्तु अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला होता. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळे एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.
दहावी फ, एक कप च्या, वास्तुपुरुष, संहिता असे अनेक मराठी चित्रपट व हिंदी लघुपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांनी आपल्या चित्रपटात दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि सर्व सामान्यांच्या गोष्टी मांडल्या. 2016 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कासव’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुमित्रा भावे यांनी सुमारे 14 चित्रपट, 50 हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांसाठी लेखन केले होते. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम. ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले.