कोलकाता / वृत्तसंस्था
प्रसिद्ध बंगाली अभिनेते पद्मभूषण सौमित्र चटर्जी यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 85 वर्षे इतके होते. येथील इस्पितळात उपचार सुरू असताना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि कलाप्रेमींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
चटर्जी यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, प्रकृतीत अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांच्यावर इस्पितळातच उपचार सुरू ठेवण्यात आले होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते.
सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक मोठे कलाकार होते. 1959 मध्ये त्यांनी ‘अपुर संसार’ या चित्रपटाच्या माध्यमातून कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुढे अभिनय बहरत गेल्यामुळे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी लोकप्रिय भूमिका साकारल्या. यशस्वी कारकिर्दीबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी, फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने गौरवित करण्यात आले होते.