समरजितसिंह घाटगे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
लोकांच्या भावनांचा विचार करून दूधगंगा नदी वरून सुळकुड (ता कागल) येथून इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचा शासनाने मंजुरी दिली आहे . याबाबाबत लोकांच्यामध्ये तीव्र असंतोष आहे.कागल, करवीर व हातकणंगले येथील नागरिक या निर्णया विरोधात संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत. तरी या शासन निर्णयाचा फेरविचार करावा.अशी मागणी निवेदनाद्वारे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे थेट वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली.
यावेळी त्यांच्यासोबत शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, गोकुळचे माजी चेअरमन व संचालक रणजीतसिंह पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील , शाहूचे संचालक मारुती निगवे व बाजार समितीचे माजी चेअरमन बाबगोंडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात लाभ क्षेत्रातील शेतक-यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. भविष्यात पाण्यासाठीचा हा लढा आणखी तीव्र होणार आहे.दुधगंगा नदीवर असणाऱ्या काळमवाडी धरणातून या पाण्याचा विसर्ग होत आहे. दूधगंगा धरण 28 टीएमसीचे असून त्याप्रमाणे त्याचे पाणी वाटपाचे नियोजन झाले आहे.पण या धरणामध्ये 25 टीएमसी पाणीसाठा होतो ही वस्तुस्थिती आहे.
धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.
पुन्हा होऊ घातलेली ही पाणीपुरवठा योजना झाली तर कागल तालुक्यातील ३९, करवीर तालुक्यातील१९, राधानगरी तालुक्यातील ३२,हातकणंगले तालुक्यातील ८, भुदरगड तालुक्यातील१५ वा शिरोळ तालुक्यातील १२ अशा एकुण १२५ गावातील शेतकर्यांच्यावर अन्याय होणार असून २४ हजार हेक्टर इतके सिंचन क्षेत्रावर परिणाम होणार आहे. डाव्या कालव्यातील सोळांकूर, पनोरी, निगवे, कावणे येवती, वडकशिवाले, नागाव, नंदगाव, एकोंडी, सिद्धनेर्ली, पिंपळगाव, सांगाव, सुळकुड त्याचबरोबर उजव्या कालव्यातील सरवडे, बोरवडे, बिद्री, वाळवे, बेलवळे, बाचणी, खेबवडे, बामणी शेंडूर, सिद्धनेर्ली , करनूर,वंदूर, लिंगनूर या गावासह कागल व करवीर तालुक्यातील इतर गावांतील शेतीवर हा परिणाम होणार आहे. तसेच कागल शहर व परिसर पिण्याच्या पाण्यासाठी या नदीवरच अवलंबून असून त्यास मोठा फटका बसू शकतो. हा या लोकांच्यावर फार मोठा अन्याय आहे.
या पाणी वाटपाबाबतचा पूर्व इतिहास असा आहे. ज्यावेळी दूधगंगा प्रकल्पातील कागल व करवीर तालुक्यातील हक्काचे हे पाणी बोगद्याद्वारे कोल्हापूर शहरासाठी देण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी या तालुक्याचे तत्कालीन नेते विक्रमसिंह घाटगे व स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी तीव्र विरोध करून हा लढा यशस्वी केला. स्व.हिंदुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत स्व.विश्वनाथ पाटील यांचेही मोठे योगदान होते.या नेत्यांसह जनशक्तीच्या रेट्यामुळे कागल, करवीर तालुक्याच्या हक्काचे पाणी आपल्या पदरात पडले. त्यामुळे या गावातील पिण्याच्या पाणी प्रश्न व शेतीच्या पाण्याचा पाणी प्रश्न मिटला. आत्ता कुठे त्यांचे हरित क्रांतीचे स्वप्न पुरे होत आहे.
सध्या या धरणात होत असलेल्या 25 टीएमसी पाणी साठयातुन कर्नाटक राज्याला चार टी एम सी पाणी जाते. त्यामुळे पाणी नियोजननुसार पाणी अपुरे पडते या नागरिक आणि शेतकरी यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर भूमिका मांडताना कागल करवीर मधील तमाम ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांचा विचार करून या योजनेबाबत फेरविचार करण्याची आग्रही मागणी श्री घाटगे यांनी केली आहे.