प्रशासनाने केल्या मागण्या मान्य, दिव्यांगानाही मिळणार कोरोनाची मोफत लस
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षापासून मानसोपचार तज्ञ नसल्याने मतीमंद दिव्यांगाचे हाल होत आहेत. त्यासह रुग्णालयीन प्रशासनाकडून गैरसोयी होत आहेत. या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारने आंदेलन केले. या आंदोलनाची दखल घेवून प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या.
या आंदोलनात प्रहारचे संपर्क प्रमुख मार्गदर्शक गौरव जाधव, सातारा सोलापूर संपर्कप्रमुख शंभूराज खलाटे, जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, आनंदा पोतेकर, समिना शेख, विद्या कारंडे, प्रवीण भुजबळ, विजय मोरे, सुभाष मुळीक, महेश जगताप, महेश शिंदे, सौरभ जाधव, प्रणीत भिसे, प्रशांत बगले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात बघताय काय सामिल व्हा, या सिव्हीलच करायच काय, निषेध हाय निषेध हाय अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना दिले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षापासून मानसोपचार तज्ञ नाहीत. त्यामुळे जिल्हय्तील मानसिकदृष्टय़ा आजारी असणाऱया रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मतीमंद दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्रापासून वंचित रहावे लागत आहेत. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी प्रमाणपत्राच्या अभावामुळे शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. जिह्यातील अनेक मनोरुग्ण उपचारापासून घरी व रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. ही बाब निंदणीय आहे.सातारा जिल्हा खूप मोठा असल्याने दिव्यांग मुलांच्या प्रमाणपत्रांसाठी 100 किलोमीटरवरुन साताऱयाला यावे लागते. प्रवास करण्यासाठी वेळेवर बस नसते. सातारा स्टॅण्डवर फुटपाथवर मुक्काम करावा लागतो. म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांची तपासणी करुन प्रमाणपत्रांची वाटप करण्यात यावे. तसेच अस्थिव्यंग प्रवर्गाचा वार बुधवार व शुक्रवार करावा. जिह्यातील दिव्यांग बांधवांचे उपचार मोफत करण्यात यावेत, महात्मा फुले आरोग्य योजनेतून प्राधान्य देण्यात यावे, दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र घरपोहच पोस्टाने देण्यात यावे, जिल्हा शल्यचिकित्सकांचे दालन तळमजल्यावर असावे, बाहेरुन डॉक्टर उपलब्ध करुन सर्व प्रकारच्या दिव्यांगाच्या टेस्ट करण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.