प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणात आढळलेल्या प्राचीन कातळशिल्पांची प्रचिती आता सर्वदूर पोहोचली आहे. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनीही घेतली असून येथील पुरातत्व विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्य़ातील 10 कातळशिल्पांचा प्रस्ताव संरक्षित होण्यासाठी शासनाकडे धाडण्यात आला आहे. काही कातळशिल्पांच्या जतन व संवर्धनाच्या कामांना चालना मिळाली असून उर्वरित कातळचित्रे राज्य संरक्षित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेची शासनाकडून अजूनही प्रतीक्षा आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ात प्राचीन मानवी संस्कृतीची पाळेमुळे या ऐतिहासिक शोधमोहिमेनंतर जगासमोर आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ात या शोधमोहिमेत 52 गावात सुमारे 1 हजार लहान-मोठय़ा आकारातील कातळशिल्पांचा खजिना सापडला. या कातळशिल्पांमुळे संशोधनाच्या दृष्टीने मोठे वैभव प्राप्त झाले. गेल्या 3 वर्षापासून कातळचित्रांवर संशोधन सुरु होते. ही मोहीम त्यातील तज्ञ व प्रमुख सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्यामार्फत तडीस गेली. संशोधनानंतर सापडलेल्या कातळचित्रांचे संरक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या सहाय्याने प्रयत्न सुरू झाले.
शोधमोहिमेत सापडलेली सर्व कातळशिल्पे अश्मयुगीन काळातील असल्याचे सांगण्यात आले. त्या कातळशिल्पांची दखल जगभरातील तंज्ञांनाही घ्यावी लागली आहे. आज स्वीडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युके, फ्रान्स येथील पर्यटक तज्ञांनीही ही शिल्पे पाहण्यासाठी भेटी दिल्या. त्या संवर्धनासाठी तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. उक्षी व देवाचे गोठणे येथील कातळचित्रांचे ग्रमपंचायत, लोकसहभागातून संरक्षण करण्यात आले आहे. पर्यटन व येथील प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणांचा अभ्यास भावी पिढीसमोर यावा, यासाठी प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी ही कातळशिल्पे राज्य संरक्षित करण्याचे पाऊल पुरातत्व विभागामार्फत उचलण्यात आले आहे. येथील 10 कातळशिल्प राज्य संरक्षित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्हय़ातून पाठवलेल्या प्रस्तावातील ठिकाणे
जिल्ह्य़ातील उक्षी, देवीहसोळ (राजापूर), बारसू येथील दोन (राजापूर), कशेळी (राजापूर), चवे, देवूड (रत्नागिरी), रामरोड (रत्नागिरी), रडेतळी (राजापूर), उमरे (रत्नागिरी) या कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य संरक्षित करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच निवळी गावडेवाडी, उमरे, कापडगाव, जांभरूण (रत्नागिरी), पोचरी, मेर्वी, देवाचेगोठणे, रडेतळी, सोलगाव, सोगमवाडी येथील कातळचित्रांचे प्रस्ताव पुरातत्व विभाग वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आले आहेत.
जिह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील 17 गावामध्ये विखुरलेल्या इतिहास पूर्वकालीन पाषाण युगातील कातळशिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या शिल्पांच्या भोवती संरक्षक भिंत आणि पर्यटकांसाठी अन्य सुविधा उभारण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या कामी पुढाकार घेतलेला आहे.