विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मागणी
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात कोरोनाचा संसर्ग जोमाने फैलावत आहे. सरकारने वाढत्या रुग्णांच्या उपचारांसबंधी आखलेल्या उपाययोजनांची माहिती लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात उपलब्ध प्राणवायू, रेमेडेसिवीर सारखी कोविड औषधे तसेच कोविड लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहीर करावा जेणेकरुन लोकांच्या मनातील भय व चिंता कमी होईल, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
सरकारने विद्यार्थ्यांची मागणी ऐकून दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, असे कामत यांनी म्हटले आहे. आज गोव्यात प्राणवायू तसेच कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱया औषधांचा तुडवडा असल्याची माहिती काही सूत्रांकडून आपल्याला मिळाली आहे. राज्यात प्राणवायू, औषधे, तसेच लसींचा आवश्यक साठा उपलब्ध करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने कोरोनाची सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठीचा कृती आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवावा.
लसीकरणात राजकीय हस्तक्षेप नको
सरकारने सर्व आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच राज्यात लसीकरण मोहीम राबवावी. लसीकरणात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, असे कामत यांनी म्हटले आहे.
सरकारने राज्यात फैलावत असलेल्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जलद कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. राज्यात येणाऱया लोकांवरही निर्बंध घालणे गरजेचे आहे. सरकारने आपले ‘वेल्थ इज हेल्थ’ धोरण बाजूला सारुन ‘हेल्थ इज वेल्थ’ हेच धोरण राबवावे, असे कामत म्हणाले.
दहावी-बारावी परीक्षांबद्दल गोंधळ
गेल्या वर्षभरात शैक्षणिक वर्षाच्या व्यवस्थापनाबद्दल कोणतेच धोरण तयार न करता सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षांबद्दल गोंधळाचे वातावरण तयार केले आहे.
राज्यात उपलब्ध इंट्रानेट ऑप्टीक फायबर केबलच्या आधारे दूरस्थ शिक्षण प्रणाली राबविण्याची सूचना आपण सातत्याने वर्षभर करीत होतो. दुर्देवाने सरकारने या सुचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्मयात घालून त्यांना परीक्षा देण्यासाठी आज केंद्रांवर बोलविण्याचा खटाटोप सरकार करीत आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.