प्रत्येकी एक रुग्णवाहिका, चार डॉक्टरांची नेमणूक : मंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती : आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल करण्याचा निर्णय
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील प्रत्येकाला मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंदांना रुग्णवाहिका आणि 4 डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासंबंधी गुरुवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. केरळ आणि तामिळनाडूमध्ये समुदाय आरोग्य सेवा उत्तम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्नाटकातील आरोग्य सेवा देशात उत्तम बनवावी, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असून त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. राज्यात 2,380 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. 30 हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हा असमतोल दूर करून नवी आरोग्य केंद्रे स्थापन करण्याबरोबरच सध्या अस्तित्वात असणाऱया आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 6 बेडची व्यवस्था असून त्यांची संख्या 12 ते 20 पर्यंत वाढविण्यात येईल. तसेच तज्ञ डॉक्टरांची संख्या तीन ते चारपर्यंत वाढविण्यात येईल. त्यामध्ये एक महिला डॉक्टर आणि एका आयुष डॉक्टराचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.
उत्तम वसती सुविधा नसल्याने अनेक डॉक्टर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा बजावण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे एकाच वसतीगृहांमध्ये परिचारिका, डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचाऱयांना राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. दोन एकर परिसरात प्रत्येकी 6 ते 8 कोटी रुपये खर्चुन नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे निर्माण केली जातील. या ठिकाणी किमान 12 बेड असणारे कक्ष, माता-शिशू चिकित्सा विभाग, प्रयोगशाळा, मधूमेह, रक्त तपासणी व इतर तपासण्या केल्या जाणार आहेत. येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपलब्ध अनुदानाचा वापर करून मोफत आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहे, असेही डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
30 हजार लोकसंख्येमागे 1 रुग्णवाहिका
यापूर्वी दर 1 लाख लोकसंख्येमागे एक रुग्णवाहिका देण्यात येत होती. आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका पुरविण्यात येईल. म्हणजेच 30 हजार लोकसंख्येमागे एक रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणखी दर्जेदार बनविण्यास साहाय्य होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
ई-इस्पितळ योजना सुरू करणार
लहान इस्पितळापासून सुपर स्पेशालिटी इस्पितळांना इंटरनेटद्वारे संपर्क पुरविण्यासाठी ई-इस्पितळ योजना सुरू केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक्स-रे काढले तरी रुग्णावरील उपचारासाठी आवश्यक असणारे सल्ले सुपर स्पेशालिटी इस्पितळातील तज्ञ डॉक्टरांकडून देण्याची व्यवस्था या माध्यमातून केली जाणार आहे. त्याकरिता दर्जेदार कॅमेरा आणि टीव्हीसह टेली-मेडिसिन व्यवस्था केली जाईल, अशी माहिती डॉ. सुधाकर यांनी दिली.