नूतन सीईओ संजयकुमार चव्हाण यांचा इशारा : 42 गावातील बांधकाम, विकसन प्रक्रिया करणार गतिमान
संजीव खाडे/कोल्हापूर
कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झाल्यापासून गेल्या साडेतीन वर्षांत झालेल्या विनापरवाना, बेकायदेशीर बांधकामांवर एमआरटीपी ऍक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाचे नूतन सीईओ संजयकुमार चव्हाण यांनी दिला आहे. चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला. आगामी काळात प्राधिकरणातील 42 गावातील विकसनाला प्रोत्साहन देणे, बांधकाम परवानगीची प्रक्रिया गतिमान करणे, मंजुरीच्या प्रतिक्षेत असणाऱया फाईल्सना तत्काळ मंजुरी देणे आदी कामे प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून केली जातील, नागरिकांना मंजुरीसाठी फेऱया माराव्या लागू नये अशी यंत्रणा राबविण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
कोल्हापूर शहराच्या हद्दीवाढीला विरोध झाल्यानंतर लगतच्या गावांचा विकास करून त्यांना भविष्यातील काळात शहरात समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. 16 ऑगस्ट 2017 रोजी विकास प्राधिकरण स्थापन झाले. त्यानंतर 2018 रोजी जिल्हÎाचा प्रादेशिक विकास आराखडाही तयार झाला. मात्र स्थापनेनंतर गेल्या साडेतीन वर्षांच्या कासव गतीने काम झाल्याने प्राधिकरणाचे कार्यालय टीकेचा विषय बनले होते. आवश्यक तो स्टाफ, यंत्रणा शासनाकडून उपलब्ध न झाल्याने प्राधिकरणाचे याआधीचे सीईओ शिवराज पाटील हतबल झाले होते. त्यांच्या बदलीनंतर प्रसाद गायकवाड यांच्याकडे प्राधिकरणाचा अतिरिक्त पदभार होता. आता प्राधिकरणाला नगररचना विभागाचे उपसंचालक असणाऱया संजयकुमार चव्हाण यांच्या रूपाने पूर्णवेळ सीईओ लाभला आहे.
तरुण भारतशी बोलताना त्यांनी प्राधिकरणाचे काम गतिमान करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले, प्राधिकरणातील 42 गावांना जिल्हÎाचा प्रादेशिक विकास आराखडा, नव्याने लागू झालेला युनिफाईड बायलॉज (एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) यातील नियम, तरतुदी लागू आहेत. त्यानुसार बांधकाम, विकसनाला परवानगी दिली जाते. प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर बांधकाम परवानगी, मंजुरीच्या ज्या फाईल प्रलंबित आहेत. त्यांना तत्काळ परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राधिकरणातील गावात अनेक ठिकाणी विनापरवाना बांधकामे, परवानगी न घेता जागांचे ले-आऊट तयार करून त्याची विक्री करण्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी कार्यालयाकडे आल्या आहेत. त्याची तपासणी करून विनापरवाना बांधकाम, विकसनावर एमआरटीपी ऍक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
फसवणूक टाळण्यासाठी प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट द्या
प्राधिकरणातील 42 गावात अनेक ठिकाणी विनापरवाना प्लॉट तयार करून त्याची विक्री सुरू आहे. विनापरवाना घर, बंगला बांधून त्याची विक्री केली जात आहे. त्याचा फटका खरेदी करणाऱयांना बसण्याचा धोका आहे. त्यामुळे कोणताही प्लॉट, घर, बंगला खरेदीचा व्यवहार कायदेशीर आहे की नाही याची तपासणी करा. त्यासाठी प्राधिकरणाच्या कार्यालयात संबंधित मिळकतीसंबंधी परवानगी, मंजुरी आहे की नाही याबाबतची माहिती देण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन फसवणूक टाळा, असे आवाहन सीईओ चव्हाण यांनी केले आहे.
कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणातील गावे (संख्या 42)
करवीर तहसिलमधील गावे ः मौजे शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, वळीवडे, गांधीनगरसह चिंचवाड, मुडशिंगी, नवे वाडदे सहित, सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव (एमआयडीसी क्षेत्र वगळून), कणेरी, कंदलगाव, पाचगाव, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, मादळे, सादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगील खुर्द, कसबा करवीर (भाग), उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव.
हातकणंगले तहसिलमधील गावे : मौजे टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली (एमआयडीसी क्षेत्र वगळून)