अयोध्येत संतांची महत्त्वाची घोषणा : 2022 पर्यंत मंदिर पूर्ण होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अयोध्येत दाखल झालेल्या संतांनी राम मंदिरासंबंधी महत्त्वाची घोषणा केली आहे. मंदिर प्रस्तावित प्रारुपानुसारच उभारले जाणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य वासुदेवानंद सरस्वती यांनी दिली आहे. तर अखिल भारतीय संत समितीचे पदाधिकारी जितेंद्र सरस्वती यांनी मंदिर 2022 पर्यंत उभारले जाणार असल्याचे सांगितले आहे. दोन्ही संत राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांच्या जन्मोत्सवात सामील झाले आहेत.
प्रस्तावित प्रारुप कोटय़वधी हिंदूंच्या मनात स्थान मिळवून असून याचे घरोघरी पूजन झाले आहे. जगातील सर्वाधिक उंचीचे राम मंदिर उभारण्यासंबंधी बोलणाऱया व्यक्तींना मी ओळखत नसल्याचे उद्गार वासुदेवानंद सरस्वती यांनी काढले आहेत. भूमी सपाटीकरणाच्या कार्यानंतर मंदिर उभारणीचे काम सुरू होणार आहे. मंदिर उभारणीत शिल्पांचा वापर होणार असल्याने हे काम कमी कालावधीत पूर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रामलल्लाचे मंदिर 2022 पर्यंत उभारले जावे. निवडणुकीच्या मैदानात लोक उतरण्यापूर्वी रामलल्ला मंदिरात दिसून यावेत, असे विधान भारतीय संत समितीचे महामंत्री जितेंद्र आनंद सरस्वती यांनी केले आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या सरकारांनी नेहमीच राम मंदिर उभारणीत अडथळे निर्माण करण्याचेच काम केले आहे. रामलल्लाचे भक्त योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यावरच मंदिराचा निर्णय होऊ शकल्याचा दावा त्यांनी केला आहे.