ऍड. रमाकांत खलप यांचे प्रतिपादन : प्रा. उल्हास प्रभुदेसाई यांच्या पंधरा पुस्तकांचे प्रकाशन
प्रतिनिधी / केपे
आजवर काही अंशी एकांगी झालेले इतिहासाचे लेखन प्रा. उल्हास प्रभू देसाई यांनी आपल्या अजनाभवर्षे, जंबुद्वीपे, भरतखंडे या सनपूर्वी पंधरा सहस्र ते भारत स्वातंत्र्यापर्यंतच्या त्रिखंडात्मक ग्रंथांमधून खोडून काढून भारतीय इतिहासाला एक वेगळाच न्याय दिलेला आहे. आज खरा इतिहास उजेडात येण्यासाठी प्रभूदेसाईंसारखे इतिहास संशोधक तयार होणे ही काळाची गरज आहे. संपूर्ण भारतातील नामवंत विद्यापीठांमधून तिथल्या इतिहास विभाग प्रमुखांच्या गाठीभेटी संदर्भ घेऊन लेखकाने वास्तविक इतिहासाचे लेखक केले आहे. कृत्रिम अपंगत्वावर मात करीत या वयोवृद्ध साहित्यकाराने केलेल्या कौतुकास्पद कार्याची पोच देताना आपण काही अंशी कमी पडत असल्याची खंत व्यकत करतो. अशी प्रतिक्रिया प्रमुगा पाहुणे व वक्ते या नात्याने श्री चंद्रेश्वराच्या सभागृहातील व्यासपीठावरून रमाकांत खलप यांनी प्रतिपादित केली. मूळ संस्कृत भाषेतील गीता त्यांनी कोकणी, मराठी, हिंदी व इंग्रजी या चार भाषांमधून भाषांतरित करून आम्हा गोमंतकीयांना ऋणी केलेले आहे, असे मतही त्यांनी मांडले. मूळ पोर्तुगीज भाषेतील कोमुनिदाद कोड, महाजन मंडळ कायदा व गोवा राष्ट्रीय वने या तीन ग्रंथांचे इंग्रजी व मराठीत अनुवादन करून सदर अनुवादकाने पीढीपुढे एक आदर्श पाया घातलेला आहे, असे विचार त्यांनी प्रकट केले.
स्वागताध्यक्ष प्रकाश शं. वेळीप यांनी उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा अल्प परिचय करून दिला. प्रभुदेसाई यांनी आजवर 90 पुस्तके प्रकाशित करून मराठी शारदेची केलेली सेवा बहुमोलाची आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी चौसष्ट कलांच्या प्रांगणात शंभरीची वाटचाल करावी. आपण त्यांच्या पाठीशी सर्वतेपरी खंबरीपणे उभा राहीन, अशी त्यांनी ग्वाही दिली.
प्रकाशित झालेल्या पंधराही पुस्तकांवर टिपणे सादर करून न्याय देणारे प्रमुख वक्ते डॉ. बाळकृष्ण खरात, प्रा. वैभव खानोलकर, प्रा. पौर्णिमा केरकर, ऍड. वल्लभ गांवस देसाई यांनी लेखकाचे कौतुक केले.
लेखकाने मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपणास तनमनधनाने सहाय्य करणाऱया आश्रयदात्यांचे ऋण व्यक्त केले. आजच्या पंधरापैकी तेरा पुस्तकांचा मुद्रणखर्च पेलणाऱयांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आजवर आपणास गोवा, भारत आणि विदेशात लाभलेल्या एकाहत्तर पुरस्कारांचे श्रेय त्यांनी आश्रयदात्यांना दिले.
कु. आद्या गावस हिने केलेल्या ईशस्तवन व चंद्रेश्वर आराधनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आराध्य गांवस यांनी उपस्थितांचे आभार मानले. आद्या गांवस हिने ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतून पसायदान गायिले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ‘श्री चंद्रेश्वर बिल्वमाला’ संस्थेचे अध्यक्ष शशीकांत प्रभूदेसाई व अभिलाषा गावस यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक मणगुतकर यांनी केले.