माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे प्रतिपादन : माझा गाव : माझी माणसं पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी/कोल्हापूर
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्यात सामाजिक जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडते, असे प्रतिपादन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.
प्रा. नलगे यांच्या माझा गाव : माझी माणसं या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. प्रा. नलगे यांचे हे साहित्यिक जीवनातील 95 वे पुस्तक ठरले आहे.
डॉ. पाटील यांनी प्रा. नलगे यांच्या साहित्यिक प्रवासाचे कौतुक केले. ते म्हणाले, नलगे यांनी साहित्यातील सर्व प्रकार आपल्या लेखनीतून रेखाटले आहेत. ग्रामीण जीवनाचे जीवंत शब्दचित्रण आपल्या कलाकृतीतून केले आहे. इयत्ता सातवी शिक्षण घेत असताना त्यांनी लिखानाला प्रारंभ केला. सामाजिक जीवनातून विविध पैलूंची अनुभूती देणारे त्यांचे साहित्य, लेखनशैली काळजाला भिडणारी आहे. माझा गाव : माझी माणसं हे पुस्तक बदलत गेलेल्या ग्रामीणवर प्रकाश टाकणारे आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
शाहीर डॉ. राजू राऊत म्हणाले, प्रा. नलगे 1950 पासून गेली 71 वर्षे अखंडपणे साहित्य लेखन करत आहेत. मराठी ग्रामीण साहित्य प्रवाहाला आपल्या लेखनीतून गती देण्याचे काम त्यांनी केले आहे. माझा गाव : माझी माणसं या पुस्तकात रेखाटलेले गाव आणि माणसं आपल्याला अंतर्मुंख करतात.
कार्यक्रमला रामचंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, हरिश्चंद्र पाटील, सरदार जाधव, प्रदीप नलगे, राजू राठोड, प्रकाशक दादासाहेब जगदाळे, अभिजित कुराडे आदी उपस्थित होते.