हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे प्रतिपादन, मडगाव रवींद्र भवनात गौरव सोहळा, पुस्तकांचे प्रकाशन
प्रतिनिधी /फातोर्डा
प्रा. श्रीकृष्ण अडसूळ हे अष्टपैलू आहेत. साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असतो व तो तसाच राहणार आहे. हे सगळे करताना आपण समाजाचे काही देणे लागतो, आपण समाजाचे ऋणी आहोत आणि ते ऋण फेडणे आवश्यक आहे याची प्रा. अडसूळ यांना जाणीव आहे. त्यासाठीच ते वर्षातील एका महिन्याचा पगार समाजकार्यासाठी खर्च करतात, तेही कुठलाही गाजावाजा न करता. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये लाचारी नसून लीनता आहे. अशा लोकांची समाजाला गरज आहे, असे उद्गार हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी मडगाव रवींद्र भवनाच्या परिषदगृहात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना काढले.
रवींद्र भवन आणि प्रा. श्रीकृष्ण अडसूळ गौरव समिती, मडगाव यांच्यातर्फे प्रा. अडसूळ यांच्या शैक्षणिक सेवेच्या चाळिशीनिमित्त गौरव समारंभ तसेच ‘कृष्णानुबंध’ व ‘सृजनवेध’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गौरव समितीचे आणि रवींद्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक, रवींद्र भवनच्या सदस्य सचिव संध्या कामत, गौरव समितीच्या सदस्या मेघना कुरूंदवाडकर, गौरवमूर्ती प्रा. अडसूळ व वीणा अडसूळ उपस्थित होत्या.
पुढे बोलताना आर्लेकर म्हणाले ???की, अडसूळ यांनी अनेक ऋणानुबंध जोडलेले आहेत. हे सर्व पाहण्यासाठी खास दृष्टी लागले. ती दृष्टी त्यांच्याकडे आहे. असे समृद्ध जीवन जगलेले अडसूळ म्हणजे मडगावकरांचे, गोव्याचे वैभव आहे. त्यांचे विचार म्हणजे अनुभवाचे बोल आहेत. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीत व वाणीत सरस्वती आहे. त्यातून त्यांनी सांगितलेले अनुभव म्हणजे जीवनाचे सार आहे, जे सर्वांसाठी उपयुक्त आहे. त्यांनी शब्दबद्ध केलेल्या भावना ह्रदयापर्यंत पोहोचतात, असे त्यांनी सांगितले.
वाचन संस्कृती निर्माण करावी
अडसूळ यांनी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली आहे. हे खरे आहे. आमची वाचनाची आवड कमी होत चालली आहे. वाचन नसेल, तर पुस्तकांचा काय फायदा, असा प्रश्न आर्लेकर यांनी केला. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे पुढील पिढीसाठी प्रत्येकाने आपल्या घरात वाचन संस्कृती निर्माण करावी. अडसूळ यांनी सृजनवेध या पुस्तकात शैक्षणिक उपक्रमांबद्दल लिहिले आहे. हे उपक्रम शाळेत, घरात राबवू शकतो का याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांची दोन्ही पुस्तके महत्त्वाची आहेत, असे ते म्हणाले. भाषेबद्दल बोलताना आर्लेकर म्हणाले की, मराठी व कोकणी या दोन्ही आमच्या भाषा आहेत. त्यात दुरावा नको. कारण या दोन्ही भाषांमध्ये आमची संस्कृती आहे, असे त्यांनी सांगितले.
अडसूळ यांचे विचार शिक्षकांनी ऐकण्याची गरज : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, प्रा. अडसूळ यांचे विचार सर्व शिक्षकांनी ऐकण्याची गरज आहे. प्रत्येक शिक्षकांने ते ऐकून अंमलात आणले, तर समाजात खूप मोठे परिवर्तन होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारचे परिवर्तन होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. भावी पिढी घडविण्यासाठी योग्य शिक्षकांची गरज आहे. शिक्षण खात्याला मी याबद्दल सूचना देईन, असेही सावंत यांनी सांगितले. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना मनात रूजायला हवी. फक्त पैसेच नव्हे, तर समाजासाठी खूप काही देता येते. एकदा भावना मनात रूजली, तरच ते शक्मय आहे. आयुष्यात जेवढे विद्यार्थी आले त्या सर्वांना जोडून ठेवून त्यांचे पत्ते, मोबाईल नंबर इत्यादी माहिती ठेवणारे शिक्षक मिळणे आजकाल कठीण आहे. पण प्रा. अडसूळ यांनी ते? केले आहे. हे अप्रतिम आहे. अडसूळ यांनी शिक्षकी पेशाला खरोखरच न्याय दिला आहे, असे ते म्हणाले.
अडसूळ सरांनी घडविले : नाईक
दामोदर नाईक यांनी सांगितले की, आज माझी ही अडसूळ सरांना गुरुवंदना आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जसा उपदेश दिला तसेच या गुरुरूपी श्रीकृष्णाने मला मार्गदर्शन करून घडविले व दिशा दाखवली. चौगुले महाविद्यालयात शिकत असताना मला वैयक्तिक कामामुळे वर्गात जाणे व शिक्षण घेणे जमत नव्हते. अशा वेळी सरांनी? मला त्यांच्या घरी बोलावून घेतले व दररोज दोन तास ते मला शिकवत होते. त्यांच्या विषयाचे नोट्स ते द्यायचे. मी शिक्षण सोडू नये म्हणून माझ्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली व? त्याचे फळ म्हणून मी पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम आलो आणि माझे छायाचित्र महाविद्यालयाच्या विद्या अंकात आले, असे त्यांनी सांगितले.
राजकारणात सुद्धा त्यांचे मार्गदर्शन मला लाभले आहे. सरांनी माझ्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. आजही ते 24 तास समाजाच्या कल्याणासाठी वावरताना दिसतात. अनेकांना पुस्तके प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. महाराष्ट्र ही जन्मभूमी असली, तरी गोव्याला कर्मभूमी मानून त्यांनी अनेकांना मार्ग दाखविला आहे, असे नाईक म्हणाले.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. अडसूळ यांनी सांगितले की, त्यांच्यावर स्व. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झाले आहेत. बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा देताना घरात असलेल्या संत ज्ञानेश्वराच्या मूर्तीबद्दल सांगितले. गोव्यात आल्यावर आपल्याला स्व. गजानन रायकर, स्व. मधुकर मोर्डेकर, स्व. बाळा काकोडकर, स्व. माधव पंडित यासारख्या व्यक्ती भेटल्या. चौगुले महाविद्यालयातील कारकिर्दीत स्व. विश्वासराव चौगुले व तेथील चार प्राचार्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. दामोदर नाईक यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. समाजाला कशा प्रकारे मदत केली ते थोडक्मयात त्यांनी सांगितले. पुण्यात वृद्धाश्रम बांधण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला. हर्षा फळदेसाई यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. अडसूळ यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कुरूंदवाडकर यांनी वीणा अडसूळ यांची खणा-नारळाने ओटी भरली. विनय कामत यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रभाकर ढगे यांनी केले, तर आभार कुरूंदवाडकर यांनी मानले.