उत्तर प्रदेशातील एटाह जिल्हय़ातील मरहरा गावातली ही विचित्र कहाणी आहे. या गावातील एक घरंदाज विवाहित महिला एका युवकाच्या प्रेमात पडली. प्रेमाचा प्रभाव इतका होता, की तिला आपला पती आणि संसारही नकोसा वाटू लागला. अखेरीस तिने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी समजाविण्याचा बराच प्रयत्न केला. तथापि, तिने आपले ते खरे केलेच. पतीला सोडून ती प्रियकराबरोबर राहू लागली. अनेक महिने प्रियकराने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.
सारे काही आपल्या मनासारखे घडत आहे, या आनंदात ती होती. पण ‘वरचा न्याय’ काही वेगळाच असतो, याचा अनुभव तिला लवकरच आला. वर्षभराच्या एकत्र वास्तव्यानंतर प्रियकर आणि त्याचे आईवडील यांनी तिचा छळ सुरू केला. तिने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. तेव्हा प्रियकराने तिच्यासह दुसऱया गावी भाडोत्री घर घेतले. तिने लग्न करण्यासाठी घाई चालविली. त्यावेळी थोडी कमाई झाल्यानंतर लग्न करू, असे आश्वासन देऊन तो तिच्यापासून दूर होऊन आपल्या आईवडिलांकडे राहू लागला. मधल्या काळात तिला त्याच्यापासून एक मुलगीही झाली होती. काही काळ वाट पाहून ती त्याच्या घरी पोहोचली. तथापि, त्याने लग्न करण्यास नकार दिला. आता ती मुलीसह इकडे तिकडे भटकत आहे. तिने पोलिसात तक्रारही दिली आहे. तथापि, न्याय मिळविण्यासाठी आवश्यक तेवढे आर्थिक बळही तिच्यापाशी आता नाही.