ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहून काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यांनी पत्राची सुरुवातीला योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
त्या आपल्या पत्रात लघु व मध्यम उद्योग, व्यापारी, अंगण सेविका, कामगार, किसन, करारावर काम करणारे कामगार आदी लोकांसाठी काही सवलती देण्याची मागणी केली आहे. तसेच 11 उपाय योजना देखील सुचवल्या आहेत.
यामध्ये त्यांनी प्रायव्हेट स्कूलची फी माफ करण्यात यावी तसेच गृह कर्जावर शून्य टक्के व्याज दर लावण्यात यावे त्याच बरोबर कर्जाचा मासिक हफ्ता सहा महिन्यांसाठी पुढे ढकलावा असे म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतमाल खरेदीची हमी द्यावी आणि शेतकऱ्यांचे विजेचे बिल माफ केले जावे असे देखील म्हटले आहे.
त्याबरोबरच शिक्षा मित्र, आंगणवाडी सेविका, करारावर काम करणारे कामगार या सर्वांना प्रोत्साहन निधी देऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी असे ही प्रियांका गांधी यांनी यावेळी सांगितले.
लघु आणि कुटीर उद्योगाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्यात यावा तसेच या उद्योगांशी संबंधित बँक कर्जे माफ करावीत. तसेच कापड उद्योगाशी संबंधित विणकरांनाही सूट द्यावी त्याच बरोबर त्यांचे विजेचे बिल माफ करण्यात यावे आणि विणकरांना प्रति कुटुंब बारा हजार रुपयांची मदत केली जावी.
याबरोबरच पोल्ट्री व्यवसायीकाला प्रत्येक कोंबडीच्या मागे 100 रुपयांची आर्थिक मदत दिली जावी, असे ही प्रियांका गांधी यांनी या पत्रामध्ये सुचवले आहे.