ऑनलाईन टीम / लखनऊ :
काँग्रेस महासचिव आणि उत्तर प्रदेश प्रभारी तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी लखीमपूर खीरी गावात दाखल झाल्या. इथे प्रियांका गांधी यांनी पंचायत निवडणुकांदरम्यान गैरवर्तनाला सामोरे जावे लागलेल्या महिलांची भेट घेतली.
ब्लॉक प्रमुख निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील पसगवा गावात राहणाऱ्या अनिता यादव यांना काही जणांकडून गैरवर्तनाला सामोरे जाव लागले होते. समाजवादी पक्षाच्या उमेदवार रितू सिंह ब्लॉक प्रमुख पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना काही जणांकडून त्यांना रस्त्यात अडवण्यात आले होते. तसेच अनिता यादव यांची साडी खेचण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. ही घटना समोर आल्यानंतर संबंधित क्षेत्रातील पोलिस निरीक्षक, पसगवा स्टेशन प्रभारी, चौकी प्रभारी एक निरीक्षक आणि तीन उपनिरीक्षकांसहीत एकूण सहा पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते.
या भेटीनंतर प्रियांका गांधीनी भाजपच्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे. भेट देताना प्रियांका म्हणाल्या की, एक महिला असल्याने मी अनिताला भेटायला आले आहे. मी येथे पक्षाची नेता म्हणून आलेली नाही. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या लखीमपूर भेटीचे फोटो शेअर करुन लिहिले की, ‘पक्षानुसार नाही तर दुखःनुसार नाते जपणाऱ्या नेत्याचे नाव प्रियांका गांधी आहे’. काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनी लिहिले की, फोव करून भेटणे आणि प्रत्यक्षात भेटणे यात मोठा फरक आहे.
यापूर्वी लखनऊ दाखल झालेल्या प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘जिल्हा पंचायत अध्यक्ष आणि ब्लॉक प्रमुख निवडणुकांत हिंसाचार घडवून आणण्यात आला. पोलीस आणि प्रशासनाकडून उमेदवारांचे अपहरण करण्यात आले. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जाणाऱ्या उमेदवारांना पोलिसांनी उचलून नेले. नामांकन पत्र फाडण्यात आले. महिला उमेदवारांनाही मारहाण करण्यात आली. प्रशासनाकडून नागरिकांना मतदानासाठी धमक्या देण्यात आल्या. योगी सरकार लोकशाहीची हत्या करण्यासाठी पोलीस प्रशासनासहीत प्रत्येक गोष्टीचा वापर करत असल्याचा’ आरोप प्रियांका गांधी यांनी केला होता.