सांगली जिल्हय़ाच्या वाळवा तालुक्यात घटना : खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर
प्रतिनिधी / इस्लामपूर
सांगली जिल्हय़ाच्या वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथे भर रस्त्यात मित्रानेच मित्राचा पाठलाग करून धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. खून करून आरोपी राजेंद्र मारुती बांदल (25, रा. जांभुळवाडी) हा इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची कबुली आरोपी बांदल याने पोलिसांसमोर दिली. अभिजीत हरी शेलार (22, रा. जांभुळवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
राजेंद्र व अभिजीत हे जवळचे मित्र होते. दोघेही अविवाहित असून सेंट्रींग कामाबरोबरच मोलमजुरी करीत होते. मृत अभिजीत हा सध्या एसवायबीएमध्ये शिकत होता. मृत अभिजीत याचे पूर्वी एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. हे संबंध तुटल्यानंतर आरोपी राजेंद्र याचे तिच्याशी सूत जमले. यावरून या दोघांत अधूनमधून वादावादी होत होती. प्रेमाच्या आड येत असल्याच्या रागातून राजेंद्रने अभिजितचा कायमचा काटा काढला.
वाघवाडी येथे बॉम्बे रेयॉन कारखान्याच्या मागील भाग निर्जन असून बुधवारी दोघे एकत्र असतानाच या प्रेम प्रकरणातूनच दोघांत खटका उडाला. रागाने बेभान झालेल्या राजेंद्र याने काही अंतर पाठलाग करून धारदार शस्त्राने अभिजितचा गळा चिरला. तसेच त्याच्या पोटात भोकसले. खुनानंतर राजेंद्र इस्लामपूर पोलीस स्थानकात हजर झाला. त्याने मित्राचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी यांच्यासह पथक घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृत अभिजित शेलारची आई सुवर्णा शेलार यांनी पोलिसांत राजेंद्र बांदल याच्याविरुद्ध फिर्याद दिली. मृत अभिजितचे मूळ गाव पेठ-गोळेवाडी आहे. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे अभिजीत आपल्या आई व भावासह आजोळी जांभूळवाडीला राहत होता.