पनवेल येथून गुहागरला निघाला होता दुचाकीने, आल्यापावली माघारी परतण्याची नामुष्की
प्रतिनिधी/खेड
मुंबईस्थित चाकरमान्यांनी गावची वाट धरल्याने महामार्गावर पोलिसांनी वॉच ठेवला आहे. पायी प्रवासासह खासगी वाहनाने गावी येणाऱ्या अनेकांना आल्यापावली माघारी परतावे लागत आहे. नवी मुंबई – पनवेल येवून एक २६ वर्षीय तरूण प्रेयसीला भेटण्यासाठी दुचाकीवरून गुहागरच्या दिशेने निघाला. कशेडी येथे नाकाबंदी दरम्यान, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विरह सहन होत नसल्याने प्रेयसीला भेटण्यासाठी गुहागर येथे जाण्याकरिता मुभा देण्याची केलेली आर्जव पोलिसांनी धुडकावून लावल्याने त्याला आल्यापावली माघारीच परतावे लागले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणाचा नागरिकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येत आहे. अनेकजण गाव गाठण्यासाठी पोलिसांना चकवा देण्याकरिता विविध कारणांचा भडिमार देखील करत आहेत. काकीच्या मृत्यूसह आजोबांचे निधन झाल्याचे कारण पुढे करत गाव गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचे बिंग फोडले आहे.
या घटना ताज्या असतानाच गावी असणाऱ्या प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर जिवाचा आटापिटा करत आहेत. नवी मुंबई – पनवेल येथील हा तरूणही दुचाकीने थेट प्रेयसीला भेटण्यासाठी गुहागरला निघाला. कशेडी येथील नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी त्याची दुचाकी थांबवून विचारणा केली असता गुहागर येथील प्रेयसीला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगितले. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बरेच दिवस प्रेयसीची भेट झालेली नसून विरह सहन होत नसल्याने पुढील प्रवासास परवानगी देण्यासाठी तो गयावया करू लागला.
मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे प्रवासाचा कुठलाही परवाना नसल्याने जिल्ह्यात प्रवेश नाकारताच हतबल झालेला तरुण पोलिसांकडे काकुळतीला येवून विनवणी करू लागला. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांनी त्यास प्रवेश नाकारत कडक शब्दात समज दिली. यानंतरच हा तरूण दुचाकीने परतीच्या प्रवासाला निघाला.