प्रतिनिधी/ लांजा
मुंबईतून गावी येऊन प्रियसीला घेऊन पुन्हा मुंबईत घेऊन जाणाऱया प्रियकर व प्रियसीला पोलिसांनी पकडून लांजात विलगीकरणं केले आहे. मात्र प्रतिबंधक क्षेत्रांतून आलेल्या त्या युवकांमुळे त्या गावातील तब्बल 34 जणांना होम क्वॉरंटाईन व्हावे लागले आहे. प्रेमासाठी आला आणि प्रेयसी व स्वतःसहीत गावालाही क्वॉरंटाईन केल्याचे बोलले जात आहे.
मालवण तालुक्यातील एका गावात दोन महिन्यांपूर्वी एक युवती गावी आली होती. त्या युवतीशी मुबंईतील एका युवकाचे प्रेम होते. युवती गावी आल्याने दोघांची दोन महिने ताटातूट झाली होती. त्या प्रियकराला तिची ओढ लागल्याने त्याने तिला परत मुबंईत नेण्यासाठी तिचे गाव गाठले. लॉक डाऊन असतानाही तो युवक त्या युवतीच्या गावी पोहोचला. सीमा बंदी असताना लपूनछपून त्या युवकाने तिच्या गावी एक दिवस वास्तव्य केले. दुसऱया दिवशी ते दोघेही मुबंईला जाण्यासाठी निघाले. 27 एप्रिल रोजी तो गावी आला. मात्र मुंबईकडे जात असतानाच लांजा पोलीस तपासणीत ते दोघेही सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली. लांजा पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांना ही माहिती दिली त्यानुसार त्या गावात तो युवक त्या काळात संपर्कात आला, त्या ठिकाणच्या 34 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.