प्रो. वांगारी मथाई, आज असत्या तर 1 एप्रिलला त्यांचे ‘सहस्त्रचंद्र दर्शन’ वाढदिवस वर्ष संपले असते. काही माणसे ठरावीक एका राष्ट्राची नसून, ‘वैश्विक’ असतात. त्यांच्या कामामुळे समस्त मानवजातीला प्रेरणा मिळत असते. वांगारी यांचा जन्म आफ्रिका खंडातील केनिया राष्ट्रात ‘न्येरी’ या छोटय़ा शहरात 1 एप्रिल 1940 रोजी झाला होता. त्यांचे बहुतांशी शिक्षण शिष्यवृत्तीवर, परिस्थितीशी आणि पुरुषी वर्चस्ववादी वृत्तीशी झगडत झाले. वयाच्या 24 व्या वषी त्यांनी जैवविज्ञानात पदवी मिळवली. पाठोपाठ ‘पिटर्सबर्ग’मध्ये पदव्युत्तर शिक्षणही घेतले. प्राणी शरीरशास्त्रात ‘नैरोबी’ आणि ‘जर्मनी’ अशा संयुक्त विद्यापीठाच्या शिक्षण कार्यक्रमातून 1971 मध्ये विद्यावाचस्पती ही पदवीही मिळवली. अशी पदवी मिळवणाऱया त्या पूर्व आणि मध्य आफ्रिकेतील पहिल्या महिला होत्या. नैरोबी विद्यापीठात प्राणी शरीरशास्त्राची पहिली महिला प्राध्यापक, पहिली महिला विभागप्रमुख असे ‘पहिली महिला’ असण्याची अनेक बिरुदे त्यांच्याशी नेहमीच जोडली गेली होती.
वांगारीची संपूर्ण जगाला ओळख आहे ती ‘ग्रीनबेल्ट मूव्हमेंट’च्या प्रवर्तक म्हणून. या चळवळीचा जन्म झाला त्यांच्या विश्लेषक बुद्धीतून आणि स्त्रीवादाशी असणाऱया घट्ट नाळेतून. आफ्रिकी राष्ट्रे पहिल्यापासून गरीबीच्या दुष्टचक्रात अडकलेली आहेत. केनिया या चिमुकल्या राष्ट्राची अजूनही तीच गत आहे. गरीबीचा जंगलतोडीशी, जमिनीच्या आणि पर्यावरणाच्या ऱहासाशी संबंध असतो. चुलीसाठी जळण, जनावरांसाठी चारा, जंगलाधारित रोजगार या साऱया गोष्टीचे महिलांशी जैविक नाते आहे. पर्यावरणाच्या ढळलेल्या समतोलातून उद्भवणाऱया दारिद्रय़ाची झळ महिलांना सर्वाधिक बसते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि दारिद्रय़ निमूर्लनासाठी वांगारीनी झाडे लावण्याचा सपाटा सुरू केला होता. या पुढाकाराचे रूपांतर पुढे एका मोठय़ा चळवळीत झाले. शाळा, चर्च, डोंगर, शेती, जंगले अशा सर्व ठिकाणी मिळून वांगारीच्या नेतृत्वाखाली चार कोटी झाडे जगवली गेली. ही ‘हरितपट्टा चळवळ’ पुढे आफ्रिकेमधल्या टांझानिया, युगांडा, मालवी, लेसोथो, झिम्बावे आदि राष्ट्रातही पसरली. त्याचे पुढे ‘पॅन आफ्रिका ग्रीन बेल्ट मूव्हमेंट’ असे नामकरणही झाले.
वांगारी, त्यांच्या प्राध्यापकीय जीवनापासून केनियाच्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत्या. केनियातील महिला राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून 1976 पासून त्यांनी राजकीय कामाला प्रारंभ केला. 1981 ते 1987 या कालावधीत त्यांनी परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते. हरितपट्टा चळवळीला मिळणारा वाढता पाठिंबा आणि पर्यायाने वांगारींची प्रसिद्धी स्थानिक सरकारच्या पोटदुखीला आमंत्रण देणारी ठरली. डॅनियल मोई सरकारने वांगारींची आणि त्यांच्या चळवळीची अनेकदा निर्भर्त्सनादेखील केली होती. डॅनियल सरकारने शंभर एकर जंगल नामशेष करून गृहबांधणी प्रकल्प आकाराला आणण्याचे ठरवले होते. हरितपट्टा चळवळीने या प्रकल्पाला कडाडून विरोध केला.
याच प्रकल्पाला रचनात्मक विरोध म्हणून चळवळीद्वारे वृक्ष लागवड अभियान जोमाने राबवले गेले. ही झाडे लावत असतानाच त्यांना पोलिसांद्वारे अटक झाली होती. अटकसत्र हा त्यांच्या आयुष्याचा नियमित भाग बनून पोलिसांनी अनेकदा त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाणही केली होती. सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय कोणत्याही देशात पोलिस असे धाडस करत नसतात. वांगारींचा जमीन माफिया आणि जंगल जमीन हडपणाऱया भांडवलदारांसोबतचा लढा आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेत होता. आफ्रिकन देशांवरची कर्जे रद्द होण्याकरिता जो लढा झाला त्याचा त्या सहप्रवर्तक होत्या. 2004 च्या शांततेच्या नोबेल पुरस्काराआधीही वांगारीचे कर्तृत्व अनेक पुरस्कारांनी अधोरेखीत केलेले आहे. युरोपमधल्या फ्रान्स आणि आशियातील जपान राष्ट्राने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना बहाल केला होता. जगातील सात प्रमुख विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट देऊन तिला पुरस्कृत केलेले आहे. 2004 च्या नोबेल समितीच्या मते, वागांरींचा चिरस्थायी विकासाबाबतचा दृष्टीकोन हा एकात्मिक आणि सर्वंकष आहे. तिच्या विश्लेषणात लोकशाही, मानवी हक्क आणि मुख्यत्वे महिला हक्क यांचा एकजिनसीपणा असायचा. वांगारीला पुरस्कार म्हणजे लोकशाही हक्कांसाठी लढणाऱया कार्यकर्त्यांना प्रेरणा दिल्यासारखे असायचे. पर्यावरणाचा ऱहास आणि गरीबीच्या विरोधात बोलण्यासाठी तिने जगभर प्रवास केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक सभांमधून ती बोलली. ‘पृथ्वी परिषद’ या युनोच्या महत्त्वपूर्ण परिषदेमध्ये तिचे पर्यावरण आणि विकास या विषयावरील आढावा घेणारे भाषण आजही उद्बोधक मानले जाते. जागतिक शांतता, न्याय आणि समानता एकवटण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या महिलांना एकत्र आणण्याच्या पुढाकारामध्ये त्यांचे योगदान वादातीत राहिलेले आहे. दारिद्रय़ निर्मूलन आणि चिरस्थायी विकासासारख्या जटिल मुद्यांवर जागतिक मतैक्मय एकवटणाऱया वांगारीला कौटुंबिक पातळीवर मात्र अपयश स्वीकारावे लागले. काळाच्या पुढे असणारी माणसे सर्वच पातळय़ांवर एकाचवेळी यशस्वी होतील असा निसर्गनियमही नसतो. मवागीकडून घटस्फोटाचा दावा हरल्यावर वांगारीनी न्यायाधीशांवर केलेल्या टीकाटिप्पणीमुळेही त्यांना तुरुंगात जावे लागले होते. जोडीदाराबद्दल कडवट असलेल्या वांगारी आपल्या वावेरु, वांजीरा आणि मुटा या मुलांबाबत विलक्षण हळव्या होत्या. त्यांच्या मृत्युसमयी त्यांची रुथ नावाची नात त्यांच्यासोबत होती. काळय़ा आईची अखंड सेवा करणाऱया वांगारी कर्करोगाने ग्रस्त होत गेल्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्या कार्यरत होत्या. आपल्या खंडप्राय देशातील जैवविविधतेविषयी त्यांना अपार कुतूहल होते. भारताच्या निमंत्रणावरून त्यांने 2006 सालचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ आणि 2007 सालचा ‘जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार’ राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर 2007 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात स्वीकारला होता. त्याच संध्याकाळी इंडिया हॅबिटाटमध्ये त्यांचे निमंत्रितांसाठी व्याख्यान झाले होते. ‘पृथ्वीचे अनमोल सौंदर्य आणि ठेवा आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करुया’ या त्यांच्या भावनिक समारोपाने ती सभा मंतरून गेलेली होती. एरवी शासक आणि स्वयंभू असणाऱया दिल्लीकरांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली होती.
केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्ती सेवेमध्ये असल्यामुळे शासन प्रतिनिधी या नात्याने मी वांगारींना प्रत्यक्ष पाहू शकलो, ऐकू शकलो होतो. नैसर्गिक संसाधनांच्या अभ्यासकांना त्या नेहमीच ‘मोठी आई’ वाटत आल्या आहेत. त्यांचे जाणे हा निसर्गाचा अटळ नियम असला तरी त्यांचे शाश्वत विकासाचे प्रेरणादायी काम अभ्यासकांच्या-कार्यकर्त्यांसोबत नेहमीच राहिल. आपल्या भोवतालची आणि पर्यावरणाची आपण सजगतेने काळजी घेणे हेच त्यांचे कृतीशील स्मरण राहील.
डॉ. जगदीश जाधव