प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र आणि राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र प्लास्टिकबंदी केवळ आदेशापुरतीच राहिली असल्याने शहर आणि उपनगरात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातदेखील प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारी आणि नाले तुंबत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्लास्टिकमुळे नैसर्गिक हानी होत असल्याने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी केवळ वर्षापुरती करण्यात आली. त्यानंतर प्लास्टिकचा वापर पुन्हा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. शहरातील कचराकुंडय़ा प्लास्टिक पिशव्यांमुळे भरत आहेत. तसेच काही नागरिक प्लास्टिक पिशव्यांमध्ये कचरा भरून रस्त्याशेजारी टाकत असल्याने कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. ओला कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये रस्त्याशेजारी टाकण्यात येत असल्याने भटकी जनावरे कचरा पसरवत आहेत. तसेच कचऱयावर प्रक्रिया करताना अडचणी निर्माण होत आहे. प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने विल्हेवाट लावण्याची समस्या भेडसावत आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून महापालिकेने प्लास्टिक बंदी कारवाई पूर्णपणे बंद ठेवली आहे. त्यामुळे शहरात प्लास्टिक पिशव्यांची विक्री खुलेआम सुरू आहे. सध्या प्लास्टिक वापर वाढल्याने पुन्हा प्लास्टिकची समस्या भेडसावू लागली आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातदेखील प्लास्टिकचा वापर वाढला आहे. घरोघरी जावून कचरा जमा करण्याची मोहीम कॅन्टोन्मेंट बोर्डकडून राबविण्यात येते. पण कचऱयासोबत प्लास्टिकच्या कचऱयाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीची कारवाई काटेकोरपणे राबविण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतला आहे. प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. जर प्लास्टिकचा वापर करताना किंवा प्लास्टिक पिशव्यांची विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.