दुबई / वृत्तसंस्था
पहिल्या टप्प्यातील दमदार प्रदर्शनाच्या बळावर आपला संघ आयपीएल प्ले-ऑफमध्ये सहजपणे आपले स्थान निश्चित करेल, असा विश्वास दिल्ली कॅपिटल्सचा पेसर कॅगिसो रबाडाने व्यक्त केला. दिल्ली प्रँचायझीने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 8 सामन्यात 6 विजय संपादन केले असून पहिला टप्पा स्थगित केला गेला, त्यावेळी ते आघाडीवर राहिले होते.
‘पहिल्या टप्प्यात आम्ही अतिशय दमदार प्रदर्शन साकारले. संघासाठी ही सकारात्मक बाब ठरली. याहूनही सरस कामगिरी साकारण्याचे आमचे लक्ष्य आहे. प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी आणि त्यानंतर अंतिम फेरीत स्थान निश्चितीसाठी आम्ही आघाडीवर असणार आहोत’, असे रबाडाने नमूद केले. पहिल्या टप्प्यात खेळू न शकलेला श्रेयस अय्यर आता संघात परतला असल्याने ही जमेची बाजू असेल, असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
‘श्रेयस अय्यर संघात परतला, ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. तो उत्तम फलंदाज आहे आणि त्याच्या उपलब्धतेमुळे संघात आणखी वैविध्य येते. तो स्वतःही दर्जेदार योगदान साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल’, असे रबाडा येथे म्हणाला. जलद गोलंदाज रबाडाने या हंगामात आतापर्यंत 8 बळी घेतले असून यंदा जेतेपद संपादन करण्याची संघाला उत्तम संधी असेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
मागील हंगामात दिल्लीने उपजेतेपदापर्यंत मजल मारली होती. आता जेतेपद हे मुख्य लक्ष्य असेल, याचा त्याने उल्लेख केला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध लढतीने दुसऱया टप्प्यातील आपल्या मोहिमेला प्रारंभ करणार आहे.