ऑनलाईन टीम / तरुण भारत
पश्चिम बंगालमध्ये सोमवारी, तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर बारा घरांना आग लावली. या हिंसाचारात १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात ते जिवंत जळले आणि मरण पावले होते. याशिवाय मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. याबाबत राज्यपाल जगदीप धनखर यांनी शोक व्यक्त करत प. बंगालमध्ये हिंसाचार अन् जंगलराज सुरु झाल्याची टीका केली आहे.
यावर बोलताना राज्यपालांनी ही घटना म्हणजे राज्य हिंसाचार आणि जंगलराज संस्कृतीच्या हातात असल्याचे म्हटले आहे. धनखर यांनी व्हिडिओ ट्वीटकरत ममता सरकारवर या घटनेनंतर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तर राज्यपालांच्या या वक्तव्यावर अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर या घटनेने मला खूप दुःख झाले असून, यासंदर्भात आपण मुख्य सचिवांकडून अहवाल मागवल्याचे राज्यपालांनी सांगितले असून, या घटनेची चौकशी करण्यासाठी ममता बॅनर्जी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.