तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा सध्याचा चर्चेतला चित्रपट. कौटुंबिक हिंसाचारावर आधारित या चित्रपटात नात्यांमधल्या चढ-उतारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सामाजिक विषयावरच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोणताही हिंसाचार हा वाईटच! त्यातही कौटुंबिक हिंसाचारामुळे संपूर्ण कुटुंबाची घडीच विस्कटते. पती आणि पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. या सगळ्या प्रकरणात मुलं भरडली जातात. आज अनेक महिला पतीची मारहाण सहन करतात. महिलांच्या हक्कांसाठी बरेच कायदे करण्यात आले असले तरी कुटुंबाच्या इभ्रतीपायी बर्याचजणी तोंडातून ‘ब्र’ही काढत नाहीत. यात अनेक सुशिक्षित महिलांचाही समावेश असतो. मात्र अमृता अशी नाही. पतीने थप्पड लगावल्यानंतर ती घटस्फोटसाठी अर्ज करते. यानंतर काय घडतं, अमृताची भूमिका योग्य असते का, तिला घटस्फोट मिळतो का हे ‘थप्पड’ या चित्रपटात पाहता येईल. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यात तापसी पन्नूची प्रमुख भूमिका आहे. तापसी अमृता ही व्यक्तिरेखा साकारते आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केलं आहे. पवैल गुलाटी, रत्ना पाठक, तन्वी आझमी, दिया मिर्झा, राम कपूर, कुमुद मिश्रा, सुशील दहिया असे कलाकार या चित्रपटात आहेत. अमृताचा पती एका पार्टीमध्ये चारचौघांसमोर तिच्यावर हात उगारतो. या घटनेमुळे अस्वस्थ झालेली अमृता पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल करते. घटस्फोटासाठी अर्ज करते. या एका थपडेमुळे अमृताच्या सुखी आयुष्यात मोठं वादळ येतं. या एका थपडेमुळे नातेसंबंधांना कलाटणी मिळू शकते का, नातं मोडणं खूप सोपं असतं पण ते निभावणं खूप कठीण असतं. म्हणूनच एक थपडेमुळे नातं मोडता येतं का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. सामाजिक विषयावरचा हा चित्रपट प्रेक्षक कशा पद्धतीने स्वीकारतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.