ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोनाचं सावट कमी झाल्याने दोन वर्षांनी नागरिक निर्बंधमुक्त होळी आणि धुळवड साजरी करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यात लावलेल्या निर्बंधांवर विरोधी पक्ष आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध होत असताना होळीवरील हे निर्बंध मागे घेत सर्वांना दिलासा दिला. तसेच नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात एकत्र न येता रंगांचा सण साजरा करावा. तसंच करोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात ठेवून दिशानिर्देशांचे पालन करावे, असं आवाहन सरकारने केलं आहे. दरम्यान, मध्येप्रदेशातील भाजपनेत्याने पाण्याचा अपव्यय टाळावा या संदेशावर सँटप्प व्यक्त केला आहे.
दरम्यान, होळी आली की पाणी वाचवा असा संदेश फिरायला लागतो. आता पाण्याचा अपव्यय टाळा असा संदेश होळी निमित्ताने सोशल मीडियावर सध्या फिरत आहेत. या मेसेजेसवर मध्य प्रदेशातील भाजपा नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी प्रतिक्रिया दिली असून काही लोक देशातील तरुणांना दूर लोटण्यासाठी सांस्कृतिक दहशतवाद पसरवत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच फक्त हिंदू सणांमध्येच सांस्कृतिक दहशतवाद का? असा सवालही त्यांनी केला आहे.
मंत्री विश्वास सारंग यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केलं. ते म्हणाले की, “केवळ हिंदूंच्या सणांमध्येच पर्यावरणाविषयी बोलून सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जात आहे”. पुढे बोलताना ते म्हणाले की, “असे संदेश पसरवत देशातील तरुणांना हिंदू सणांपासून दूर नेण्याचा कट आहे”.
संस्कृती आणि परंपरेशी संबंधित हिंदू सणांपासून तरुणांना दूर ठेवण्याचा या संदेशांचा उद्देश आहे, असा दावा त्यांनी केला. हा आमच्या भावी पिढीवरील हल्ला आहे. देशात सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जात आहे. लोक होळीच्या दिवशी पाणी वाचविण्याचा संदेश देतात. पण, वाहनं धुताना किती पाणी वाया घालवतात? आपण होळीमध्ये असं किती पाणी वापरतो? पाणी वाचविण्याचा संदेश फक्त होळीलाच का दिला जातो? होळीला असं किती पाणी वाया जातं? असे सवालही भाजप मंत्री सारंग यांनी उपस्थित केले.