यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील सलामीची लढत मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात खेळवला गेला तो अबु धाबीतील झाएद स्टेडियमवर. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता आहे 22 हजार. पण, यंदा आयपीएल स्पर्धेसाठी प्रेक्षकांना प्रवेश नाही. त्यामुळे, सर्व स्टेडियम रिकामे होते. पण, तरीही जितके किमान कर्मचारी लागतात, असे 70-80 जण स्टेडियमवर होते आणि हेच लोक पहिल्या सामन्याचे प्रत्यक्ष साक्षीदार ठरले!
आता हे 70-80 जण कोण होते, ते ही महत्त्वाचे. ते होते सुरक्षारक्षक, स्टेडियमचे कर्मचारी, वैद्यकीय पथकातील सदस्य आणि काही मोजके स्वयंसेवक!
एरवी, कोणताही सामना असेल तर प्रेक्षकांचा गलका, गोंधळ, जल्लोष असणार, हे निश्चित असते. पण, यंदाची स्पर्धा त्याला अपवाद असेल, याचे संकेत शनिवारी मिळाले. फलंदाजांनी चौकार, षटकार वसूल केल्यानंतर आणि गोलंदाजांनी बळी मिळवल्यानंतर प्रेक्षकांच्या कृत्रिम गोंगाटाचे संग्रहित ध्वनिफित प्रसारित केली गेली. यंदा प्रेक्षक स्टेडियमवर येऊ शकणार नसल्याने अशी व्यवस्था आयोजकांना करावीच लागेल. पण, अशा प्रत्येक सामन्यात जवळपास 70-80 खास व्यक्तींना हा सामना प्रत्यक्ष संधी मिळणारच, हे देखील येथे स्पष्ट झाले!