- देवेंद्र फडणवीसांच्या टीकेनंतर नवाब मलिक यांची खोचक टीका
ऑनलाईन टीम / मुंबई :
सर्व केंद्राने करायचे मग राज्याने काय माशा मारायच्या का? या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सवालावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? माशा मारण्याचा आनंद घ्या, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?, असा जबरदस्त टोला मलिक यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाकडून माशा मारण्याच्या स्पर्धाही भरवा!, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे. त्यांच्या या टीकेमुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे आता लक्ष आहे.
खरंतर, राज्यात कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, ऑक्सिजन, लॉकडाऊन आणि मराठा आरक्षण यामुळे सत्ताधारी आणि विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. अशात वारंवार आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यालाच नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.