मुंबई/ ऑनलाईन टीम
गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारी रोजी होम क्वॉरंटाईन होते असं म्हणतात तर मग त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाचे उत्तर देत अनिल देशमुख यांनी फडणवीसांचा दावा खोडून काढला आहे.
अनिल देशमुख यांनी एका व्हिडीओद्वारे ही मागणी केली आहे. मी नागपूरच्या रुग्णालयात 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान अॅडमिट होतो. मला कोरोना झाला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जात असताना मला काही पत्रकार भेटले. त्यांनी मला सेलिब्रिटजवरील वादावर काही प्रश्न केले. तेव्हा माझ्या अंगात ताप नव्हता. पण अंगात त्राण होता. मला थकवा आलेला होता. त्यामुळे रुग्णालयाच्या गेटवरच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर मी थेट गाडीत बसून घरी गेलो आणि होम आयसोलेशनमध्ये गेलो. त्यानंतर २८ फेब्रुवारीला मी सह्याद्री गेस्ट हाऊसला पहिल्यांदा आलो, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले होते ?
देवेंद्र फडणवीस यांनी थेट 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला. देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
शरद पवार यांनी काय म्हटले होते?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्याकाळात महणजे ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यामुले हे स्पष्ट होत आहे की ज्या कालावधीसंदर्भात आरोप केले जात आहेत, त्या काळात अनिल देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे राजीनाम्याच्या मागण्यांना काहीही आधार उरत नाही.