ऑनलाईन टीम / मुंबई :
देशाच्या देशभरात कोरोना पसरविण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केले होते. या वक्तव्याच्या निषेर्धात काँग्रेसने राज्यभरात माफी मांगो आंदोलन छेडले आहे. आज सकाळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते पोहचले. पण तत्पूर्वीच भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला. धरपकड झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, काँग्रेसला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे होते. पण भाजपने आक्रमक कार्यकर्ते रस्त्यावर उतरवून मुंबईतील वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. म्हणून आम्ही तात्पुरते हे आंदोलन मागे घेत आहेत, असे नाना पटोले यांनी जाहीर केले.
पटोले म्हणाले, आम्ही हल्लेखोर नाही. पण, आमचे आंदोलन सुरु असताना भाजपचे गुंड सागर बंगल्याबाहेर पोहचले. गुंडगिरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांना थांबवले. काँग्रेसने शांतता आणि लोकशाही मार्गाने आंदोलन केले. पण, लोकांची जी गैरसोय झाली त्याला जबाबदार भाजपचं आहे. नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा, मुंबईचा अपमान झाला तरी चालेल. महाराष्ट्र बरबाद झाला तरी चालेल. मुंबईची सगळी संपत्ती विकून गुजरातला नेली तरी चालेल. पण, नरेंद्र मोदींचे समर्थन करू, ही भाजपची वृत्ती आहे.
दरम्यान, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, म्हणून आम्ही सागर बंगल्याबाहेरील हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल, असेही पटोले म्हणाले.