मुंबई/प्रतिनिधी
कोरोनावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्र लिहल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्रं लिहून कोरोनाच्या मुंबई मॉडेलची पोलखोल केली. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे. मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी एका व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीस यांचे मुद्दे खोडून काढत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. जगभर महाराष्ट्राच्या कामाची लोक नोंद घेत आहेत. मुंबई मॉडेलची चर्चा होतेय हे पचत नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम करत असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.
कोरोना संबंधित सर्व माहिती जनतेसमोर ठेवलीय
कोरोनाच्या बाबतीत राज्य सरकार गंभीरतेने काम करत आहे. राज्याने आता पर्यंत कोणताही कोरोना पॉझिटिव्ह किंवा मृतांचा आकडा लपवला नाही. राज्यात ६ हजार२०० लॅब तयार करण्यात आल्या. जास्तीत जास्त आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यात आल्या. ही सर्व माहिती उघडपणे जनतेसमोर ठेवली आहे. सुप्रीम कोर्ट असेल किंवा विविध कोर्ट असतील, नीती आयोगानेही महाराष्ट्राच्या कोरोनाविरुद्धच्या कामाची प्रशंसा केली हेच विरोधी पक्षनेत्याला पचत नाहीय, अशी खोचक टीका मलिक यांनी केली.
भाजपशासित राज्यांमध्ये काय चाललंय?
मलिक यांनी महाराष्ट्र सरकार वर टीका होत असताना नवाब मलिक यांनी गुजरातमधील ७१ दिवसात ६१ हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस लपवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने रोज लोकांचा मृत्यू होतोय. उत्तर प्रदेशमध्ये २ हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याची बातमी आहे. म्हणजे जिथे – जिथे डबल इंजिनचं सरकार आहे ते विफल झालेय असे दाखवून महाराष्ट्रातील चांगलं काम पचत नाहीय. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योगच यांनी सुरू केला आहे, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगली कामे दिसत नसेल तर मग इलाज करु शकत नाही. मात्र महाराष्ट्रात चांगली कामे होत आहेत ही सत्य परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.