मुंबई / ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत गृहमंत्री होम क्वारंटाईन असल्याचा दावा खोडून काढला. यासोबतच शरद पवारांना खोटी माहिती दिली जात असल्याचे त्यांनी म्हटलं होते. यावर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस चुकीची माहिती जनतेसमोर ठेवत असल्याचे सांगतले. तसेच महाराष्ट्र सरकार बदनाम करण्याचे कारस्थान भाजप करत असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला.
नवाब मलिक म्हणाले की, फडणवीस चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी शरद पवार चुकीची माहिती देत असल्याचे म्हटले. फडणवीसांनी उल्लेख केल्यानंतर गृहमंत्र्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा केला होता. मीदेखील खुलासा केला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री यांच्या हालचालींसंबंधी त्यांनी काही पोलीस रेकॉर्ड सादर केले. यावेळी त्यांनी याबाबत नक्की माहिती नसल्याचं सांगितलं. याचाच अर्थ कुठेतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
यासोबतच अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाबाबत नवाब मलिक म्हणाले की, ५ ते १५ तारखेपर्यंत अनिल देशमुख नागपूर येथे हॉस्पिटमध्ये दाखल होते. डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली नव्हती. काही पत्रकार रुग्णालयाच्या गेटवर प्रश्न विचारत होते तेव्हा त्यांनी तिथे खुर्चीवर बसून उत्तरं दिली. ते नागपुरात होम कवारंटाइन होते असं आम्ही कधीच सांगितलं नाही. मुंबईत होम क्वारंटाइन होते हे स्पष्ट केलं होतं. डिस्चार्ज झाल्यानंतर खासगी विमानाने मुंबईला आल्यानंतर शासकीय निवासस्थानी २७ तारखेपर्यंत कोणतीही हालचाल नव्हती. फडणवीसांनी सांगितलं तिथं ते गेले नव्हते. फक्त व्यायामासाठी मैदानात जात होते, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. तसंच भाजप महाराष्ट्र सराकरला बदनाम करण्यासाठी कट -कारस्थान करत असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी केले.
रश्मी शुक्ला कोणतीही परवानगी न घेता फोन टॅप करत होत्या. राज्यात सरकार स्थापनेच्या काळातही रश्मी शुक्ला अनेक नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. रश्मी शुक्ला भाजपच्या एंजट या नात्याने हे काम करत होत्या. पोलीस अधिकारी बदली घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस ज्या अहवालाचा दाखला देत आहेत त्यातल्या 80 टक्के बदल्या त्या पद्धतीने झाल्याच नाहीत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ?
पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, १५ तारखेची गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका (प्रत दाखवत) आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन नोंदीचा एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील, अशी नोंद आहे. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची नोंद आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही. यात महत्त्वाची बाब म्हणजे सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होतं. मला वाटतं शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची गोष्ट वदवली गेल्याचे ते म्हणाले होते.