ऑनलाइन टीम / जळगाव :
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मिळून माझे विधानसभेचे तिकीट कापले. माझे राजकारण संपविण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीवर बोलताना खडसे म्हणाले, की दिल्ली येथील बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मला विधानसभेची उमेदवारी देण्याची तयारी होती. मात्र, देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी त्याला नकार दिला. त्यामुळेच माझे तिकीट कापले गेल्याची माहिती मला पक्षाकडून मिळाली आहे. माझे तिकीट का कापले? माझा काय गुन्हा होता? असे मी पक्षाकडे वारंवार विचारणा केली होती. त्यातूनच मला दिल्ली येथील कोअर कमिटीच्या सदस्यांनी सांगितले.
भाजपने विधानसभेत चुकीचे उमेदवार दिले. त्यामुळेच अनेक ठिकाणी पक्षाला पराभव पत्करावा लागला. परिणामी, राज्यात कमी जागा आल्या आणि सरकारही पडले. माझी हक्काची जागाही त्यांनी घालवली, असा आरोपही खडसे यांनी यावेळी केला.