ऑनलाईन टीम
स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यापूर्वी म्हणाले होते. मात्र यातील काहीच झालेलं नाही. आता ते ओबीसी आरक्षण दिलं नाही तर संन्यास घेईन म्हणतात. सत्तेसाठी ते काहीही बोलतात त्यामुळे त्यांचं म्हणणं फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना लगावला आहे. सत्ता आमच्याकडे द्या, तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण पूर्ववत देतो, अन्यथा राजकीय संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते. या वक्तव्याची थोरात यांनी खिल्ली उडवली.
सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती मात्र करायची नाही. हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणासाला फसवून सत्ता मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे. त्यासाठीच ते अशी वक्तव्ये करत असतात, असा टोलाही थोरात यांनी लगावला.
काय म्हणाले होते फडणवीस ?
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. २६ जूनला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मला सत्ता द्या, तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन, नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, असा दावा केला होता.
मी फणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही : संजय राऊत
मी त्यांची भेट घेईन, मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही. फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देशात आणि राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. त्यापैकी फडणवीस एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भाजप आणि जनतेचेही मोठे नुकसान होईल, असं राऊत म्हणाले.
शिवसेनेचेही चिमटे
यावर आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राऊत यांनी फडणवीसांना शाब्दीक टोले लगावले आहेत. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेची देखीलआहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन!,” अशा शब्दात शिवसेनेनं चिमटे काढले आहेत. तसेच ओबीसी नेत्यांचे तिकीट कापून त्यांचे पंख छाटणारे हात कोणाचे होते, हे महाराष्ट्राला कळू द्या, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.