प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना महामारीमुळे राज्याची अर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. त्यामुळे सारथी संस्थेकडून फेलोशीपसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांचे मानधन जानेवारीपासून प्रलंबित राहिले आहे. पण राज्यसरकार हे सर्व प्रलंबित मानधन लवकरच देणार आहे. सारथी संस्था बंद केली जात असल्याचा आरोप केला जात असला तरी ती बंद होणार नसून त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. कौशल्य विकास कार्यक्रमातून रोजगार वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तरीही गेली पाच वर्षे केवळ अभ्यास करण्यात घालवलेले तत्कालिन मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चुकीचे आरोप केले जात आहेत. त्यांनी पाच वर्षात केले नाही, ते आता एक वर्षात करावे अशी त्यांची मागणी असल्याचा आरोप राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
जिह्यातील संभाव्य पूर परिस्थीती, कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते>
मंत्री वडेट्टीवार म्हणाले, सारथी संस्थेची व्याप्ती वाढवून त्याद्वारे मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती कशी करता येईल यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे. राज्य सरकार अर्थिक अडचणीत असल्यामुळे फेलोशीप दिलेल्या विद्यार्थ्यांना जानेवारीपासूनचे मानधन देण्यासाठी वेळ झाला आहे. पण लवकरच ते देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मागील सरकारने सारथी संस्थेसाठी 50 कोटींची तरतूद केली. पण 500 कोटी तरतूद केल्याच्या अविर्भावात विरोधी पक्षनेते सध्या 550 कोटींची तरतूद करण्याची मागणी करत आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपतींकडून प्रलंबित मानधनाबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरु असून मराठा समाजासाठी त्यांची भूमिका योग्य आहे. ‘सारथी’ बाबत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी अशी संभाजीराजेंची मागणी आहे. आमचीही तीच मागणी आहे. त्यामुळे लवकरच बैठकीतून मार्ग काढला जाईल असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या आंदोलनात राजकीय दलाल घुसले
मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये अनेक गट पडले असून त्यामध्ये राजकीय दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यांच्याकडून अवास्तव मागणी करून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सारथी संस्थेवरून सत्ताधाऱयांवर आरोप करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात काय दिवे लावले ते जनतेसमोर सांगावे असे मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
महापूरग्रस्त जिह्यांसाठी राज्याच्या तिजोरीतून 651 कोटी
महापूरामध्ये कोल्हापुर, सांगली व सातारा जिह्यात मोठे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून आजतागायत 651 कोटी रुपये दिले आहेत. घरांची पडझड झालेल्या नागरिकांना लवकरच नुकसान भरपाई दली जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.