वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्यावसायिक पातळीवर क्रिकेट सामने खेळताना फलंदाजांना हेल्मेट सक्तीची गरज असून आयसीसीने या संदर्भात नवा नियम अंमलात आणावा अशी मागणी भारताचा माजी जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केली आहे.
क्रिकेटपटूंच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब आणि हैद्राबाद या संघातील सामना सुरू असताना हैद्राबाद संघातील अष्टपैलू विजय शंकरच्या डोक्यावर पंजाबचा क्षेत्ररक्षक निकोलास पुरनने टाकलेला चेंडू आदळला. फलंदाजाला धावचीत करण्याच्या हेतूने पुरनने हा चेंडू यष्टीच्या दिशेने टाकला पण दुर्दैवाने तो विजय शंकरच्या डोक्यावर आदळला. विजय शंकर लागलीच मैदानात कोसळला पण त्याने यावेळी हेल्मेटचा वापर केल्याने तो मोठय़ा दुखापतीतून बचावला. विजय शंकरची ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सचिनने प्रसारित केला. क्रिकेट हा क्रीडाप्रकार आता अधिक वेगवान होत असून क्रिकेटपटूंना अधिक सुरक्षित राहण्याची गरज आहे. फलंदाजांसाठी हेल्मेटची सक्ती करावी, अशी मागणी सचिन तेंडुलकरने आयसीसीकडे केली आहे. 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या फिलीप हय़ुजेसचा एका स्थानिक सामन्यात खेळताना वेगवान चेंडू डोक्यावर आदळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.