इंग्लिश महिला संघाची 4 गडी राखून बाजी, हॅट्ट्रिक
माऊंट माऊंगनुई / वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघाला आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सातत्याच्या अभावामुळे इंग्लंडविरुद्ध नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 36.2 षटकात अवघ्या 134 धावांमध्येच खुर्दा झाला तर प्रत्युत्तरात इंग्लंडने 31.2 षटकात 6 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. इंग्लंडसाठी सलग तीन पराभवानंतर हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. 23 धावात 4 बळी घेणारी इंग्लंडची गोलंदाज अष्टपैलू चार्ली डीन सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
भारतीय संघातर्फे मागील लढतीतील शतकवीर स्मृती मानधनाने सर्वाधिक 35 तर सातव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने 33 धावांचे योगदान दिले. मात्र, ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत राहण्याचा सिलसिला कायम राहिला आणि पाहता पाहता भारताचा डाव सर्वबाद 134 धावांमध्ये आटोपला.
विजयासाठी इंग्लंडसमोर 135 धावांचे तुलनेने बरेच सोपे आव्हान होते. मात्र, यासाठी त्यांना 6 गडी गमवावे लागले. डॅनी वॅट (1) व टॅमी ब्युमाँट (1) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात गारद झाल्यानंतर इंग्लंडची तिसऱया षटकात 2 बाद 4 अशी पडझड झाली. दुसऱया षटकात सर्वप्रथम वॅट बाद झाली. यावेळी मेघना सिंगच्या गोलंदाजीवर स्नेह राणाने हवेत झेपावत वॅटचा अप्रतिम झेल टिपला.
महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारी अनुभवी झुलन गोस्वामी हिने ब्युमाँटला बाद करत आणखी एक धक्का दिला. भारताने यावेळी रिव्हय़ू घेतला. झुलनसाठी हा वनडे क्रिकेटमधील 250 वा बळी ठरला.
इंग्लिश कर्णधार हिदर नाईट (नाबाद 53) व नॅट स्कीव्हर (46 चेंडूत 45) यांनी त्यानंतर डाव सावरत संघाला 10 षटकात 2 बाद 34 पर्यंत आणले. एकीकडे, नाईटने सावध, बचावात्मक पवित्र्यावर भर देत फक्त धावफलक हलता ठेवण्यावर भर दिला तर स्किव्हरने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करताना 8 चौकार वसूल केले.
विजयासाठी 135 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असल्याने इंग्लंडला एक अर्धशतकी भागीदारी टार्गेटच्या उंबरठय़ापर्यंत झेपावण्यासाठी पुरेशी होती आणि नाईट-स्किव्हर यांनी तिसऱया गडय़ासाठी 65 धावांची भागीदारी साकारत ती जबाबदारी चोख पार पाडली. नंतर पूजा वस्त्रकारने स्कीव्हरची खेळी संपुष्टात आणल्यानंतर ऍमी जोन्सने (10) नाईटसमवेत 33 धावांची भागीदारी नोंदवली. राजेश्वरीच्या गोलंदाजीवर जोन्सचा अंदाज चुकल्यानंतर उपकर्णधार हरमनप्रीत कौरने मागे धावत जात अप्रतिम झेल टिपला. मात्र, इंग्लंडला यावेळी केवळ 32 धावांची आवश्यकता होती.
भारताने त्यानंतर 30 व्या षटकात आणखी दोन बळी घेतले. मेघनाने सोफिया डंकली (17), कॅथरिन ब्रन्ट (0) यांना केवळ 3 चेंडूंच्या अंतरात यष्टीरक्षक रिचा घोषकरवी झेलबाद केले. पण, इतके प्रयत्न इंग्लंडला विजयापासून रोखण्यासाठी पुरेसे ठरणारे नव्हते. हिदर व सोफी इक्लेस्टोन यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
भारताची फलंदाजीत निराशा
तत्पूर्वी, मागील लढतीत विंडीजविरुद्ध धमाकेदार प्रदर्शन साकारणाऱया भारतीय संघाचे येथील अपयश धक्का देणारे ठरले. इंग्लंडतर्फे चार्ली डीनने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले तर श्रबसोलने 2 बळी घेतले.
या लढतीत भारताचा पराभव झाला असला तरी गुणतालिकेत 8 संघांमध्ये तिसरे स्थान कायम राहिले. भारताच्या खात्यावर आता 2 विजय व 2 पराभवांसह 4 गुण आहेत. इंग्लंडने 4 सामन्यात 2 गुणांसह सहावे स्थान मिळवले. यापूर्वी, ते सातव्या स्थानी होते.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ ः 36.2 षटकात सर्वबाद 134 (स्मृती मानधना 58 चेंडूत 4 चौकारांसह 35, रिचा घोष 56 चेंडूत 5 चौकारांसह 33, झुलन गोस्वामी 26 चेंडूत 20. अवांतर 13. चार्ली डीन 8.2 षटकात 4-23, ऍना श्रबसोल 6 षटकात 2-20, इक्लेस्टोन व केट क्रॉस प्रत्येकी 1 बळी).
इंग्लिश महिला संघ ः 31.2 षटकात 6 बाद 136. (हिदर नाईट 72 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 53, नॅट स्किव्हर 46 चेंडूत 8 चौकारांसह 45, ऍमी जोन्स 28 चेंडूत 10, सोफिया डंकली 17. अवांतर 4. मेघना सिंग 3-26, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार प्रत्येकी 1 बळी).
आघाडी फळीच्या अपयशामुळे निराशा ः मिताली, झुलनची कबुली
इंग्लंडविरुद्ध लढतीत आघाडी लाईनअपमधील फलंदाजांच्या अपयशामुळे निराशा आली, असे मिताली राज व झुलन गोस्वामी यांनी नमूद केले. पुढील टप्प्यात संघ याची पुरेपूर भरपाई करेल, अशी आशाही त्यांनी नोंदवली.
‘नाणेफेक गमवावी लागल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 200 पेक्षा अधिक धावा नोंदवणे आवश्यक होते. मात्र, तसे होऊ शकले नाही. क्षेत्ररक्षणात आमची कामगिरी उत्तम आहे. मात्र, खराब फलंदाजीमुळे चिंता आहे. पुढील लढतीत अद्याप अपराजित ऑस्ट्रेलियाचे आव्हान असल्याने कोणत्याच आघाडीवर गाफिल राहून चालणार नाही’, असे मिताली राज म्हणाली.
झुलन गोस्वामीने पुढील सामन्यात भारतीय फलंदाजांना उत्तम सूर सापडेल, अशी आशा येथे व्यक्त केली. ‘संघातील प्रत्येक खेळाडू विश्वचषकाच्या या सर्वोच्च व्यासपीठावर सर्वोत्तम योगदान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही वेळा आघाडी फळीतील फलंदाजांना तर काही वेळा मध्यफळीतील फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागतो. पण, माझ्या दृष्टीने यातून मिळणारा अनुभव महत्त्वाचा असतो. त्यापासून बोध घेत यश खेचून आणण्यावर भर देणे आवश्यक आहे’, याचा तिने पुढे उल्लेख केला.
विजयामुळे इंग्लिश कर्णधार हिदर नाईटला दिलासा
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आमची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. पण, भारताविरुद्ध विजय मिळवत ती अपयशी मालिका खंडित करता आली, हे दिलासादायी आहे, असे इंग्लिश कर्णधार हिदर नाईट म्हणाली. ‘वास्तविक, येथील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल नव्हती. पण, तरी नॅट स्कीव्हरने नेटाने फलंदाजी केली, ते लक्षवेधी होते’, असेही तिने नमूद केले.
ब्लर्ब
भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी ऑकलंडमध्ये होईल.