सांगली प्रतिनिधी
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत, पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना खरीप हंगाम 2021-22 अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 12 हजार 194 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या योजनेंतर्गत तालुक्यातील काही महसूल मंडळासाठी विमा नुकसान भरपाई लागू झालेली आहे. काही शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाईची रक्कम कागदपत्रातील त्रुटीमुळे त्यांच्या बँक खात्यावर जमा होवू शकली नाही. यामध्ये बँक खाते नंबर किंवा अस्पष्ट कागदपत्रे इत्यादी बाबीमुळे खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकलेली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी विमा नुकसान भरपाई जमा होण्यासाठी विमा भरल्याची खात्री करून एच.डी.एफ. सी. एर्गो विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक, प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोज वेताळ यांनी केले आहे.
एच. डी. एफ. सी. एर्गो विमा कंपनीकडील अहवालानुसार 11 हजार 230 शेतकऱ्यांसाठी एकूण 18 कोटी 45 लाख 63 हजार 675 इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे व त्यापैकी 11 हजार 104 शेतकऱ्यांची विमा भरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. तथापि 126 शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाईची रक्कम कागदपत्रातील त्रुटीमुळे त्यांच्या बँक खात्यावर जमा होवू शकली नाही. यामध्ये बँक खाते नंबर किंवा अस्पष्ट कागदपत्रे इत्यादी बाबीमुळे खात्यामध्ये रक्कम जमा होऊ नाही. तालुकानिहाय विमा नुकसान भरपाई न जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे – जत-41, जाटपाडी-61, कवठेमहाकाळ-10, तासगाव-6, खानापूर-8 अशी एकूण 126 आहे.