प्रतिनिधी/ सातारा
राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूलगत फळविक्रेत्यांनी रांगा लावल्या आहेत. या विक्रेत्यासाठी लाखो रूपये खर्च करून श्री. छ. प्रतापसिंहराजे भोसले (थोरले) भाजी मंडई उभारण्यात आली आहे. मात्र येथे ग्राहक येत नसल्याची कारणे पुढे करत या विक्रेत्यांनी अतिक्रमणात भर टाकली आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणावर सातारा नगरपालिका ठोस कारवाई करत नाही. यांचा चांगलाच फायदा विक्रेत्यांनी घेतला आहे. जागा दिसेल तिथे हातगाडे उभे करून विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. अशीच अवस्था राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूल लगत निर्माण झाली आहे. येथे फळविक्रेत्यांनी रांगा लावल्या आहेत. यामुळे परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनधारकांना जागा नसल्याने अस्थाव्यस्थ पार्किंग करण्यात येत आहे. या विक्रेत्यांची संख्या विचारात घेता मंगळवार पेठ मार्गावर लाखो रूपये खर्च करून श्री. छ. प्रतापसिंहराजे भोसले (थोरले) भाजी मंडई उभारण्यात आली आहे.
या भाजी मंडईत पहिल्या मजल्यावर भाजीपाला विपेत्यांना बसण्यास परवानगी आहे. तर वरचा मजला फळविक्रेत्यासाठी बांधण्यात आला आहे. सुरूवातीला हे विक्रेते या मंडळीत बसले होते. मात्र ग्राहकांनी मंडईत येत नसल्याने यांनी पुन्हा मुळ जागी थाट मांडला आहे. याकडे सातारा नगरपालिकेने दुर्लक्ष केले. यामुळे फळविक्रेत्याची संख्या वाढली आहे. यांचा वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या कारवाया लवकर थंड पडत असल्याने हे विक्रेते मनमानी कारभार करत आहेत.