स्वस्त दरामुळे मोठय़ा प्रमाणात फळांची होतेय खरेदी
प्रतिनिधी / बेळगाव
वाढत्या तेल-डाळींच्या किमतींनी जनता त्रस्त आहे. मात्र दुसऱया बाजूला आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱया फळांच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे नागरिकांना एका बाजूला आर्थिक भुर्दंड बसत असला तरी कमी दरात पौष्टिक फळांचे सेवन करण्याची संधी मिळत आहे. सध्या फळांचे मार्केट बहरले असून विविध फळे 30 ते 40 रुपये किलो दरात मिळत आहेत. यामुळे नागरिकांकडून फळांच्या खरेदीला प्रतिसाद लाभत आहे.
कोरोनाकाळात फळांचे दर वाढले होते. यामुळे सर्वसामान्यांच्या आहारातून सदर फळे कमी झाली होती. मात्र सध्या फळे स्वस्त झाली आहेत. बाजाराचा फेरफटका मारला असता गणपत गल्ली आणि परिसरात हातगाडय़ांवर फळांची विक्री करणाऱया विक्रेत्यांकडून मोठय़ा प्रमाणात फळांची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
बाजारात संत्री 20 ते 30 रु. किलो, केळी 20 ते 25 रु. डझन, बोरं 20 ते 30 रु. किलो, सफरचंद 100 रु. दीड किलो, पेरु आकारमानानुसार 10 रुपयाला 3 ते 5, डाळींब 30 ते 40 रु. किलो अशा दरात फळांची विक्री सुरू आहे. शिवाय नुकतीच दाखल झालेली द्राक्षे 60 ते 80 रु. किलो असल्याचे चित्र दिसून येत आहे.