मी 28 वर्षांची महिला आहे.
माझं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं. आई-वडिलांच्या पसंतीने मी लग्न केलं. लग्नाची बोलणी
सुरू असताना माझ्या पतीने श्रीमंतीचा आव आणला होता. त्याने मला महागडय़ा भेटवस्तू दिल्या.
महागडय़ा गाडीतून फिरवलं. छोटय़ा शहरात राहिल्यामुळे मी सुद्धा श्रीमंतीची स्वप्नं रंगवू
लागले. खूपच भारावून गेले. पण लग्न झाल्यानंतर सगळं पितळ उघडं पडलं. माझा पती सर्वस्वी
त्याच्या पालकांवर अवलंबून आहे. आपण मोठा उद्योजक असल्याचं त्याने सांगितलं होतं. पण
प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं. लग्नानंतर
माझ्यासमोर खूप कठोर वास्तव उभं ठाकलं. आमच्याकडे पुरेसे पैसेच नसतात.
मोजून मापून खर्च करावा लागतो. मला फसवणूक झाल्यासारखं वाटतंय. खूप नैराश्य आलं आहे.
मी काय करू?
– मैत्रिणी, तू दुखावली गेली आहेस. तुझ्या भावना पतीपर्यंत पोहोचव. तुझ्या बाबतीत चुकीचं घडलं आहे, याची जाणीव त्याला व्हायला हवी. त्याने तुझी फसवणूक का केली, याचा जाब विचार. या फसवणुकीमुळे तसंच सध्याच्या स्थितीमुळे तू नैराश्याच्या गर्तेत गेल्याचं त्याला सांग. भविष्यात तुझ्याशी प्रामाणिक राहण्याबाबत बजाव. आता तुझं लग्न झालं आहे. एक विवाहित जोडपं म्हणून तुम्ही जबाबदारीने वागायला हवं. एकमेकांना समजून घ्यायला हवं. एकमेकांशी संवाद साधायला हवा. विचारांचं आदानप्रदान होणं गरजेचं आहे. आपल्या नात्याला नवा आयाम देण्याचा प्रयत्न करा. चुका सुधारा. आयुष्याची दिशा ठरवा. गरज पडल्यास समुपदेशकांची मदत घ्या.