बेपत्ता होणाऱयांचे होते काय? मोजकेच ठरतात नशीबवान, सामाजिक अवहेलनेला द्यावे लागते तोंड
प्रतिनिधी /बेळगाव
डॉक्टरांकडे उपचारासाठी आलेला 51 वर्षांचा हॉटेल कामगार बेपत्ता, व्यवसायात आर्थिक फटका बसलेला कॅम्प येथील रियल इस्टेट उद्योजक बेपत्ता, चिकन दुकान चालविणारा अनगोळ येथील 35 वर्षीय युवक बेपत्ता, ब्युटीपार्लर ट्रेनिंगसाठी कडोलीहून बेळगावला आलेली तरुणी बेपत्ता, अशा बातम्या गेल्या पंधरवडय़ात वाढलेल्या आहेत. बेळगाव शहर व तालुक्मयात बेपत्ता होण्याची प्रकरणे वाढीस लागली आहेत.
एखादी व्यक्ती, महिला, मुले बेपत्ता झाली की त्यांचे कुटुंबीय पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करतात. पोलीस त्यानंतर त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करतात. तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या नातेवाईकांकडे बेपत्ता व्यक्तीविषयी चौकशी केलेली असते. बेपत्ता होणाऱया व्यक्तींचे पुढे काय होते? ते सापडतात का? सापडले तर कोणत्या अवस्थेत सापडतात? त्यानंतर त्यांचे काय होते? असे अनेक प्रश्न प्रत्येकाला सतावत असतात.
बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वृत्तपत्रातून सचित्र बातम्या छापल्या जातात. यामधील छायाचित्र व वर्णनावरून एखाद्याचा शोध लागला तर संबंधित पोलीस स्थानकाला याची माहिती दिली जाते. पोलीस त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बेपत्ता व्यक्तीला कुटुंबीयांच्या ताब्यात देतात. जर बेपत्ता झालेली व्यक्ती प्रयत्न करूनही सापडली नाही तर शोध सुरू आहे, असे सांगत त्याची फाईल जिवंत ठेवतात.
मुळात व्यक्ती बेपत्ता कशी होते? का होते? यामागची सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक कारणे काय आहेत? याचा प्रत्येक प्रकरणात विचार केला जातो. खासकरून महिला व लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणात पोलीस यंत्रणा गांभीर्याने त्यांचा शोध घेते. एखादा लहान मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाली तर यासंबंधी अपहरण प्रकरण दाखल केले जाते. तशी कायद्यात तरतूद आहे.
व्यक्ती बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे
महिला बेपत्ता प्रकरणात मानवी तस्करीचा हा प्रकार असणार का? याचाही विचार होतो. कारण फूस लावून महिलांना पळवून त्यांना वाममार्गाला किंवा घरकामाला लावणाऱया टोळय़ा कार्यरत आहेत. अनेक बेपत्ता प्रकरणे हाताळणाऱया पोलीस अधिकाऱयांच्या मते एखादी व्यक्ती बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असतात. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, अनैतिक संबंध, प्रेमप्रकरणे, कर्जबाजारीपणा अशी अनेक कारणे असतात.
पती-पत्नीत नेहमी भांडणे होत असतात. अशातच शेजारचा एक तरुण सहानुभूती दाखवून त्या महिलेशी मैत्री करतो. त्यानंतर अचानक ही महिला बेपत्ता होते. काही महिन्यांनी ती सापडली तरी आमचे प्रेम आहे, आम्ही लग्न केले आहे, असे ते सांगतात. अनेक महिला किंवा पुरुष आपल्या अपत्यांसह लग्नानंतरच्या प्रेमप्रकरणात पळून जातात. बेपत्ता प्रकरणात पोलीस स्थानकात येणाऱयांकडून प्रथम बेपत्ता होण्यामागची पार्श्वभूमी जाणून घेतली जाते. त्यानंतरच त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.
प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱया तरुण-तरुणींची प्रकरणेही पोलीस स्थानकात बेपत्ता अशीच नोंद केली जातात. मनाविरुद्ध लग्न लावून देण्याचे प्रयत्न झाले की ते लग्न चुकविण्यासाठी तरुण किंवा तरुणी बेपत्ता होतात. शहर व जिल्हय़ातील अनेक प्रकरणे मनाविरुद्ध होणाऱया लग्नांमुळेच घडली आहेत. साखरपुडय़ा दिवशीच तरुण-तरुणी अचानक बेपत्ता होतात. पोलीस स्थानकात अशा प्रकरणांची नोंद बेपत्ता अशी झाली तरी मनाविरुद्ध होणारे कार्य टाळण्यासाठी ते पळून जातात, हेच खरे असते.
अनेक प्रकरणात वर्षानुवर्षे शोध घेऊनही बेपत्ता व्यक्तीचा थांगपत्ता लागत नाही. एखाद्या पोलीस स्थानकात बेपत्ता प्रकरण दाखल झाल्यानंतर संपूर्ण जिल्हय़ात यासंबंधीची सचित्र माहिती पोलीस स्थानकांना पाठविली जाते. वेगवेगळय़ा पोलीस स्थानकांच्या हद्दीत एखादा अनोळखी मृतदेह सापडला तरी अशा वर्णनाची व्यक्ती कोणत्या तरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून बेपत्ता झाली आहे का? याची चौकशी केली जाते. वर्षानुवर्षे शोधूनही एखादी बेपत्ता व्यक्ती सापडली नाही तर नेमकी ही व्यक्ती कुठे गेली? याची कसलीच माहिती कुटुंबीयांना मिळत नाही.
कुटुंबीय असूनही अनाथासारखा मृत्यू
कौटुंबिक कारणातून अनेक जण घराबाहेर पडल्यानंतर एखाद्या धार्मिकस्थळाला जाऊन तेथेच वास्तव्य करणे पसंत करतात. अनेक जण अल्पकाळात सापडतात तर काही जण वर्षानुवर्षे कुटुंबीयांच्या नजरेला पडत नाहीत. बाहेर त्यांच्यावर मृत्यू ओढवल्यानंतर साधी त्यांची ओळखही पटत नाही. कुटुंबीय असूनही अनाथासारखा त्यांना मृत्यू येतो. कोणीतरीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतो. काही वेळातर पोलीस व शासकीय यंत्रणेला ही जबाबदारीही पार पाडावी लागते. अशा मृतदेहांवर दफनविधी करण्यासाठी रुक्मिणीनगर स्मशानभूमी येथे व्यवस्था आहे. अशा बेवारसांवर दफनविधीच केला जातो. कारण वारसदार मिळाले किंवा त्यांच्यासंबंधी कसल्याही तक्रारी दाखल झाल्या तर मृतदेह प्रसंगी उकरून काढावा लागतो. म्हणून त्यांच्यावर दफनविधीच केला जातो.
सामाजिक, आर्थिक व वैयक्तिक कारणांमुळे बेपत्ता होणारी व्यक्ती आपल्याला कोणी ओळखणार नाही, अशा गावात किंवा शहरात आश्रय घ्यायला बघते. जर का अनोळखी शहरात त्यांचा व्यवस्थित जम बसला तर ती व्यक्ती आपणहून घरच्यांना संपर्क साधते. मात्र, तिथेही अपयशच पदरात पडले तर मात्र स्वतःच अनोळखी राहणे पसंत करते. आंतरजातीय प्रेमप्रकरण किंवा विवाहामुळे बेपत्ता होणाऱयांची संख्याही अधिक आहे. पोलिसांनी त्यांचा छडा लावून परत आणल्यानंतर त्यांना घरातील मंडळी स्वीकारत नाहीत. शक्मयतो त्यांच्यातील संबंध तुटावेत, ते दोघे आपापल्या घरी परतावेत, अशी कुटुंबीयांची इच्छा असते. अनेक प्रकरणात पोलीस स्थानकात होणाऱया समझोत्यानंतर बेपत्ता होऊन सापडलेले तरुण-तरुणी आपापल्या घरी जातात. नपेक्षा अशा प्रकरणातील तरुणी किंवा महिलांची स्वाधार केंद्रात रवानगी केली जाते.
16 वर्षांनंतर झाली भेट!
मुडलगी तालुक्मयातील हळ्ळूर येथील बसवराज बाळाप्पा गड्डी हा तरुण गेल्या 16 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. गावकऱयांसोबत श्रीशैल पदयात्रेत जाऊन तो घरी परतला नाही. याच चिंतेने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. भाऊ कुठे गेला? या व्यापातून बहीणही दगावली. आईला आपला मुलगा कुठे गेला? याची चिंता खात होती. अशातच 16 वर्षांनंतर बसवराज आपल्या आईला सापडला आहे. पदयात्रेला जाताना गदग जिल्हय़ातील मुंडरगी तालुक्मयातील जालीहाळ येथे हा मुलगा पोहोचला. त्याला कडकडीत भूक लागली होती. तो भाकरीच्या शोधात होता. बिराप्पा हरकी या शेतकऱयाच्या घरी तो पोचला. आपण वाट चुकलो आहोत, अशी माहिती दिली. बिराप्पाच्या कुटुंबीयांनी 16 वर्षे त्याचा सांभाळ केला. 16 वर्षांनंतर त्यांच्याच गावातील एका व्यक्तीने जालीहाळ येथे बसवराजला पाहिले. त्याच्या आईला ही गोष्ट सांगितली. आईने बिराप्पा हरकीचे घर गाठले व बसवराजला आपल्या घरी आणले. 16 वर्षांच्या वनवासानंतर बसवराज आपल्या घरी आला. प्रत्येकजण बसवराज इतका नशीबवान असू शकत नाही.
आयुष्यभर अवहेलना
भावनेच्या भरात एखादी व्यक्ती घर सोडून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना वेगवेगळय़ा प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. पोलीस स्थानकाच्या चकरा माराव्या लागतात. समाजात खाल मानेने वावरावे लागते. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी यंत्रणा राबवावी लागते. त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक, सामाजिक, मानसिक खच्चीकरण होते. भावनेच्या भरात घर सोडून जाणाऱया तरुण-तरुणींचे जर भले झाले तर चांगलेच. मात्र, जर पलायन प्रकरणानंतर स्थिरस्थावरता नशिबी आली नाही तर मात्र आयुष्यभर अवहेलना आणि कुत्तरओढ सहन करावी लागते.