वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे अंमलात आणलेल्या ‘फिट इंडिया’ या नव्या मोहिमेमध्ये आतापर्यंत किमान 10 कोटी लोकांनी आपला सहभाग दर्शविला असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी शुक्रवारी दिली.
अहमदाबाद ते दिल्ली दरम्यानच्या एक हजार किलोमीटर पल्ल्याच्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांसाठी आयोजिलेल्या सायकल रॅली वेळी केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी वरील माहिती दिली. अहमदाबादमधील साबरमती आश्रमापासून या सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला होता. या रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी 16 दिवसांच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला. या सायकल रॅलीतील स्पर्धकांचे दिल्लीमध्ये केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ ही मोहीम भारतामध्ये यशस्वीपणे राबविली. पंतप्रधानांच्या या मोहिमेमध्ये देशातील सुमारे किमान 10 कोटी लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. भारतीय नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये सुधारणा व्हावी, या हेतूने पंतप्रधानांनी ‘फिट इंडिया’ मोहिमेची घोषणा केली होती. शुक्रवारी येथील राजघाटावर या मोहिमेची सांगता झाली. 17 सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये या सायकल रॅलीला प्रारंभ झाला होता.